जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छ्ळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इषारा ?

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा ?
 
 
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुरेश वाडकर
राग - मांड, मिश्र खमाज (नादवेध)
 
www.aathavanitli-gani.com