| चैत्रमास, त्यांत
शुद्ध नवमि
ही तिथी गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती ! दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ? राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या ’काय काय’ करित पुन्हां उमलल्या खुळ्या उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं गेहांतुन राजपथीं धावले कुणी युवतींचा संघ एक गात चालला पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें हास्याने लोपविले शब्द, भाषणें वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वीणारव नूपुरांत पार लोपले कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती गगनांतुन आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला |
||||
| गीत | - | ग. दि. माडगूळकर | ||
| संगीत | - | सुधीर फडके | ||
| स्वर | - | सुमन माटे, उषा अत्रे, जानकी अय्यर, | ||
| कालिन्दी केसकर ( आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण ) | ||||
| गीतरामायण | ||||
|
||||