सरणार कधी रण
प्रभु तरी
हे कुठवर साहू
घाव शिरी ?
दिसू लागले
अभ्र सभोती
विदीर्ण झाली
जरि ही छाती
अजून जळते आंतर-ज्योती
कसा सावरू देह
परी ?
होय तनूची केवळ
चाळण
प्राण उडाया
बघती त्यातुन
मिटण्या झाले
अधीर लोचन
खड्ग गळाले
भूमिवरी
पावन-खिंडित
पाउल रोवुन
शरीर पिंजेतो
केले रण
शरणागतिचा अखेर
ये क्षण
बोलवशिल का
आता तरी ?
|