A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जांई परतोनी बाळा

जांई परतोनी, बाळा, जांई परतोनी ।
निष्ठुर मी तुज टाकुन जातें, येशि कशाला माझ्या मागोनी ॥

जन्मतांच तव जननी गेली सोडुनि तुज या तपोवनीं ।
मींच पाळिलें लाड करोनी, कांहिं न अडलें कीं तुझें ।
गेलें जरी मीं, काय उणें तुज सांभाळिती बाबा तुजलागुनि ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- ज्योत्‍स्‍ना भोळे
बालगंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - शाकुंतल
राग - आसावरी
ताल-त्रिताल
चाल-गंगेत लोटा हा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• बाळा उपजतांच तुझी आई तुला सोडून गेली तरी तुझें कांहीं अडलें नाहीं. आतां मी सोडून गेलें तरी बाबा तुझा सांभाळ करतील. फिर बाळा माघारी.
महाराष्ट्र संगीत नाट्यकलेचे जनक कै. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनीं सन १८८० इ. सालीं कविकुलगुरु कालिदास यांच्या 'अभिज्ञान शाकुंतल' नाटकाचे 'संगीत शाकुंतल' या नांवाचें भाषांतर करून नाट्यकलेला नाके मुरडणार्‍या संगीतलोलुप महाराष्ट्र वाचकांस उपकृत करून ठेविलें त्यास आज ४९ वर्षे झालीं. या पुस्तकाच्या जन्माचा इतिहास पूर्वीं बर्‍याच लोकांस अवगत होता; परंतु त्यांपैकीं फार मोठा समुदाय कालक्रमानें कालवश झाल्यानें जे थोडे जीव धरून उरले आहेत, त्यांपैकीं हा लेखक एक आहे.

ही पुरवणी प्रस्तावना स्मरणाप्रमाणें तयार केली आहे व ती त्या वेळच्या परमेश्वरकृपेनें हयात असलेल्या दोन चार गृहस्थांच्या नजरेखाली घातली आहे.

ज्यावेळी कालिदासांनी 'अभिज्ञान शाकुंतल' नाटक लिहिलें त्याकालीं त्याचे नाट्यप्रयोग त्या कालीन रंगभूमीवर होत असत हें प्रसिद्ध आहे. परंतु त्यावरून त्यावेळच्या प्रेक्षकांमध्यें सभापति कोण होते, भूपति कोण होते, त्याकालीं समकालीन कविवर्ग कोण होता, प्रेक्षक कोणत्या दर्जाचे होते, नाटकाचे प्रयोग राजाश्रयाखालीं प्रेक्षकांस, पंडितांस, आमंत्रण देऊन होत, किंवा त्या वेळच्या नाटक मंडळीस पारितोषके देऊन करण्यांत येत, नटवर्गांत त्यावेळीं स्त्री व पुरुष पात्रांचीं कामें पुरुषच करीत कीं नटवर्ग स्त्रीपुरुष मिश्र असा होता, याचा इतिहास आज कांहींच उपलब्ध नाही. फक्त ग्रंथआधारापलिकडे पुरावा नाहीं. हें न्यून लक्षांत घेऊन ही प्रस्तावना लिहिली आहे.

आमच्याकडे पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें फक्त पौराणिक व गद्य नाटकें प्रचारांत होतीं. परंतु त्यांत सुधारणा करण्याची कल्पना कोणाच्या मनांत आल्याचें दिसत नव्हतें. १८८० मध्यें किर्लोस्कर दक्षिण भाग कमिशनर यांच्या स्वारीबरोबर पुण्यांत आले. त्यावेळीं पारशी नाटक मंडळीचा 'इंद्रसभा' हा गद्यपद्यात्मक प्रयोग पाहून अण्णासाहेबांचें मन पारशी नाटकांतील संगीत संचारानें वेधून गेलें आणि असें संगीतात्मक नाटक मराठी भाषेमध्यें केल्यास तें लोकाभिरुचीस प्रिय होईल काय या विचाराकडे लक्ष लागलें आणि 'शाकुंतला'चे भाषांतर गद्यपद्यात्मक करावें अशी मनःस्फूर्ति होऊन ते 'इंद्रसभा' नाटक पाहून सर्व मंडळी बिहाडी आल्यावर किर्लोस्करांनीं नवीन कल्पना मंडळीपुढे मांडली; ती सर्वांस रुचली. नंतर बाकीची मंडळी झोंपी जाऊन किर्लोस्करांनीं दुसरे दिवशींच्या सुप्रभातसमयीं 'शाकुंतलाच्या' भाषांतरास सुरवात करून सूर्योदयापूर्वींच प्रथम अंकाचें नांदीपासून भाषांतर केलें; तें मंडळीस अत्यंत आवडले. हें भाषांतर प्रथम चार अंकी तयार झाले.

या वेळीं मोरोबा वाघोलीकर, बाळकोबा नाटेकर हे दोघेही गाण्यावाजविण्यासंबंधानें लोकांत प्रसिद्ध होते. दोघेही तरुण, देखणे व गायनकलेंत निष्णात असल्यानें, अण्णासाहेबांच्या इच्छेनुरूप गोष्टी जुळून येण्याचा योग आला. या वेळेपर्यंत नाटकासंबंधानें लोकांच्या समजुती सर्वत्र अगदीं वाईट असत व त्या चांगल्या असण्याचें कांहीं कारण घडलेंही नव्हतें. त्यांत ही जोडी व तिसरे अण्णांच्या पूर्वाश्रमांतले स्‍नेही नाना शेवडे हे मिळल्यानें अण्णा अधिक उत्साहानें कामास लागले. शेवडे हे धंद्यानें गवयी नव्हते तरी चांगले गाणारे असत.

याप्रमाणें संगीत नाटकाला अवश्य अशीं निवडक व गुणी पात्रें मिळालें. यांशिवाय इतर जीं पात्रें पाहिजे होतीं त्यांकरतां अण्णांनीं आपल्याच कचेरींतील मोठमोठया पगाराची पदवीधर मंडळी ओढली व कोणाला कांहीं, कोणाला कांहीं, अशीं नाटकांतली किरकोळ कामें नेमून दिलीं. याप्रमाणें व्यवस्था लागल्याबरोबर तालमीस सुरुवात झाली. सुमारें १८८० च्या आगष्टमध्यें कल्पना निघून ऑक्टोबरच्या १३ वे तारखेस म्हणजे विजयादशमीच्या सुमुहूर्तानें तंबाखू आळींतील गुळवे यांच्या हवेलींत पहिल्या तीन अंकांची रंगाची तालीम झाली. तालीम सुरू झाल्यापासून संगीत नाटकाबद्दलचा गवगवा सर्व शहरांत पसरला होताच; परंतु रंगाची तालीम झाल्यापासून लोकांची उत्सुकता अधिक अधिक वाढू लागली व ते नाटकाचा दिवस कधीं येतो म्हणून वाट पाहत राहिले.

नाटकाचा दिवस ठरला. परंतु नाटकाला नांव काय द्यावें हें ठरलें नव्हतें. कारण अशा प्रकारचें नाटक व याची कल्पनाही पूर्वी नव्हती. कोणीं 'गद्यपद्यात्मक शाकुंतल' म्हणावें म्हणून सुचविलें व कोणी 'गायनयुक्त शाकुंतल' हे नांव द्यावें, असें सुचविलें. परंतु अण्णासाहेबांनी शेवटीं 'संगीत शाकुंतल' हेंच नांव योग्य आहे असें ठरविलें व त्याप्रमाणें 'किलोस्कर संगीत मंडळी'च्या नांवाचीं हस्तपत्रकें शहरांत प्रसिद्ध झाली.

मोठ्या जाहिरातीं लावून प्रसिद्धीची अवश्यकताच राहिली नाहीं; कारण तिकीटें अगोदरच पार खपून गेली होती. तारीख ३१ ऑक्टोबर १८८०, आश्विन वद्य १३, रविवार शके १८०२, अमृतसिद्धि योग हा संगीत नाटकाचा प्रथम दिवस. बुधवार पेठेंतील त्यावेळीं भरभराटींत असलेलें 'आनंदोद्भव नाटकगृह'. तिन्ही मजले गच्च भरलें होतें. 'सकल कला गुणवेत्ते पंडित' त्या दिवशीं जमले होते.

प्रत्येकाच्या मुद्रेवर व पात्रांच्या अंतःकरणांत उत्साह दिसत होता. पात्रांची तयारी झाली. सूत्रधार दोन पारिपार्श्वकांसह पडद्यांत सज्ज होऊन नांदी म्हणण्याकरितां उभे राहिले* व आतां नाटयशास्त्रविधीप्रमाणे पडद्यांत,
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश हा आधीं नमितों
हें मंगलाचरण म्हणण्यास सुरुवात करणार, तो जणूं पडदा ओढणारासही तेवढा विलंब असह्य होऊन त्याने एकदम पडदा वर केला. त्याबरोब अण्णासाहेबांनी घेतलेली सूत्रधाराची भव्य मूर्ति प्रगट होऊन त्यांचा गंभी आवाज, नाटेकर व शेवडे या पारिपार्श्वकांचे गंधर्वतुल्य आलाप प्रेक्षकांच्या कर्णद्वारीं प्रवेश करूं लागले. त्या प्रसंगी अण्णांचा रंगभूमीवरचा हा प्रवेश म्हणजे संगीत कलेच्या विश्वकर्म्याचा अवतार, असे लोकांस वाटू लागले.
(* नांदी (मंगलाचरण) पडद्यांत म्हणून सूत्रधानें प्रवेश करावयाचा असा कांहीं संस्कृत नाटकांतील सांप्रदाय आहे. परंतु वरील प्रसंगी ती प्रथमच रंगभूमीवर म्हणण्यांत आली.)

शकुंतलेची भूमिका शं. बा. मुजुमदार यांनीं घेतलीं. मुजुमदारांचा स्त्रीवेष, गर्भश्रीमंताचे घराण्यांतील यौवनयुक्त रूपसंपन्‍न, तरुणीसही खालीं मान घालावयास लावील असा 'रूपसुंदरी' परिपूर्ण होता. तसेंच भाषण गोड, सभ्य अभिनय, ठसठशीत कुंकुमतिलक, गोंडस अंगलोट, वर्ण सुवर्ण केतकीसारखा, सर्व प्रकारें मोहक असा होता !

रा. शंकरराव मुजुमदार त्यावेळीं न्यू इंग्लिश स्कूलमध्यें ६ वे इयत्तेंतील विद्यार्थी होते, व त्यापूर्वीं ते सांगलीकर पौराणिक नाटक मंडळीमध्यें स्त्रीवेष घेत असल्यावेळेपासून सुप्रसिद्ध होते. दुष्यंताची भूमिका मोरोबा वाघोलीकर यांचेकडे होती. यांचा एकंदर शरीराचा बांधा राजकीय वेशाला साजेल असाच होता. त्याच तोडीची रा. शंकरराव मुजुमदार यांचे शरीराची अंगलट, सुवर्ण केतकीसारखा वर्ण, बोलण्याचालण्याची ढब कुलवधूची, हरिणाच्या नेत्रासारखे नेत्र इत्यादि हें गर्भश्रीमंताचे घराण्यांतील गृहलक्ष्मीलाही लाजविणारें स्त्रीसौंदर्य असल्यानें त्यांची योजना शकुंतलेच्या भूमिकेस अगदी यथार्थ झाली होती.

या सर्व पात्रांचे योजक किर्लोस्कर यांचें नाट्यनैपुण्यच तारीफ करण्यासारखें आहे. रा. मुजुमदार यांस गायनकला साध्य नव्हती तरी त्यांनीं त्या वेळच्या संगीत प्रयोगामध्यें किंचितही उणीव जाणूं दिली नाहीं. पुढें रा. लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे रूपानें सुंदर, पल्लेदार व मधुर आवाजाचे संगीतकुशल नट लाभल्यानें त्यांची शकुंतलेच्या पात्राचे जागीं योजना होऊन त्यांचेसाठीं पद्येंही तयार झाली. हीं पद्यें खुद्द अण्णासाहेब यांनी रचलीं नसून त्यांचे आज्ञेवरून त्यांचे शिष्य रा. रा. गोविंदराव देवल यांनीं रचिलीं. हीं पद्यें शुद्ध, सुबोध, प्रासादिक व रसिकांस मान्य अशीं झालीं आहेत. कै. देवल यांनी संगीत नाटकाचे कवित्वास येथूनच आरंभ केला होता. ह्यानंतर त्यांनीं संगीत विक्रमोर्वशीय, मृच्छकटिक, शापसंभ्रम, शारदा, संशयकल्लोळ या नाटकांमध्यें जी प्रसिद्धि मिळविली तो मान अजून कोणासही प्राप्त झाला नाहीं. असो.

कै. किर्लोस्कर जसे प्रासादिक कवि होते, तसे ते उत्तम नटही होते. शाकुंतलमध्ये कण्व शिष्य शार्ङ्गरवाची भूमिका त्या काळी त्यांनी अशी वठविली कीं त्याचा शतांशही आतांपर्यंत कोणासही साधला नाहीं. शार्ङ्गरवाच्या एका पद्यामध्यें 'निज धन तें चोराला' हें पद्य आणि यांत एका गद्याचे शेवटी “अधःपात !" असा शब्द आहे. या दोन ठिकाणीं रसिक प्रेक्षकगणांनीं टाळीची कडकडून गर्जना केली नाहीं असा एकही प्रयोग त्या काळीं झाला नाहीं. तो प्रसंग ज्यांनीं पाहिला आहे त्यांस त्या प्रसंगाची जीवमानपर्यंत कधीही विस्मृति होणार नाहीं. कै. किर्लोस्कर हे संगीत शाकुंतलामध्यें सूत्रधार, वैखानस, सेनापति, शार्ङ्गरव कंचुकी, मारीचऋषि या भूमिका रंगभूमीशीं तादात्म्य होऊन करीत असत. ती तादात्म्यता आतांपर्यंत कोणासच साधली नाहीं !
(संपादित)

त्रिंबक नारायण साठे
दि. १ जानेवारी १९३०
(रा. रा. बिंबक नारायण साठे यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीशीं जवळ जवळ तिच्या प्रारंभापासून निकट संबंध असल्यामुळें त्यांनीं सदर कंपनीचे संस्थापक व सदर कंपनी आणि त्यांचीं नाटकें याबद्दल आमच्या विनंतीवरून गोळा केलेली माहिती प्रसिद्ध होणें इष्ट वाटलेवरून तो उपोद्घात म्हणून या आवृत्तींत दिला आहे.)
'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पुस्तकाच्या १९३० सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक, आर्यभूषण)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  ज्योत्‍स्‍ना भोळे
  बालगंधर्व