A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुकर वनवन फिरत

मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला,
भोगि पुष्पमाला; अभिनव कुसुम मधुपा
सहज सुखविति नूतन शृंगाराला ॥

भ्रमर सुरस वनिं दिसला कमला टाकुनि;
कच अदय भयद झाला; कोमेजलें सुमनदल,
दुखवि मजला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर
स्वराविष्कार- बालगंधर्व
मधुवंती दांडेकर
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - विद्याहरण
राग - देस, सोरठ
ताल-एक्का
चाल-पिया कर धर देखो, धरकत है मोरि छतिया
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कच - केस / बृहस्पतीपुत्र. हा पुष्कळ दिवस शुक्राचार्यांजवळ राहून संजीवनी विद्या शिकला. शुक्राचार्यांच्या कन्येचे, देवयानीचे, याच्यावर प्रेम होते.
गुंजारव - भुंग्याचा गुणगुण नाद.
भयद - भिती उत्‍पन्‍न करणारा.
मधुकर - भ्रमर, भुंगा.
मधुप - भुंगा, भ्रमर.
सुमन - फूल.
सुरस - मधुर.
शास्त्रींच्या मनांत एक गोष्ट मात्र पुनःपुनः येत असे. केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी 'मानापमान' नाटकात एकत्र भूमिका केल्या होत्या. बालगंधर्व आणि दीनानाथ यांनीसुद्धा रंगभूमीवर समोरासमोर यायला हवं होतं. बहार उडाली असती. दीनानाथांनी स्वतः गात असलेल्या सगळ्या नाट्यगीतात, आपलं असं एक वैशिष्ठय निर्माण केलं होतं. 'रवी मी चंद्र कसा' हे गाणं फक्त धैर्यधर-दीनानाथ गात असत. इतर धैर्यधरांना हे आणि अशा तर्‍हेची गाणी गाण्याचं साहस दाखवता आलं नाही.

बालगंधर्व तर स्वरांचे सम्राट. सुरांच्या माध्यमातून अभिनय करीत. शब्दांचा उच्चार इतका लाडिक-लडिवाळपणे करीत की, आवाजाच्या मृदु-मुलायम स्पर्शाने पद-रचनेचा ओबड-धोबडपणा नकळत गाळून पडे.

शास्त्री सांगतात, विद्याहरण नाटकातलं 'मधुकर वन वन फिरत करी' हे गाणं, 'पिया कर धर देखो, धरकत है मोरी छतिया ।' या हिंदी पदाच्या चालीवर बसविलेलं होतं. हिंन्दी पदाच्या शब्दांतच नाद-माधुर्य होतं. मराठी गीत त्या मानाने थोडं खडबडीत वाटायचं. बालगंधर्वांनी आपल्या लडिवाळ उच्चारशैलीने आणि स्वरातल्या लवचिकपणाने ह्या गाण्याचा कायापालट केला. हिंदी पदाइतकेच, शब्द, माधुर्याने भिजून बाहेर पडत.

त्या काळात सगळीच नाटकं रात्री रंगवीत असत. पण अशी ही रात्र, दीनानाथांच्या आणि बालगंधर्वांच्या, संगीत आणि जुगलबंदीने नटलेली रात्र, एकदा तरी रंगायला हवी होतं.

दीनानाथांच्या मृत्यूनंतर नाट्यसृष्टीविषयी शास्त्रींना वाटणारी जवळीक संपली. शिवाय, एका दृष्टीने, नाट्यसृष्टीत मन्वंतर सुरु होतं. त्यातहि आनंद होता. पण तो तिर्‍हाईताचा आनंद होता. जुन्या युगाची परिसमाप्ती झाली, ह्यात खेद किंवा खंत नव्हती, पण जवळीक नाहीशी झाली होती एवढं खरं.
(संपादित)

शंकर बाळाजी शास्त्री यांच्या पत्‍नी प्रा. तारा शास्त्री यांनी लिहिलेल्या 'स्मृतिरंजन' लेखातून.
तरुण भारत, नागपूर; दीपावली विशेषांक १९७२.
सौजन्य- दै. तरुण भारत, सिद्धार्थ शंकर शास्त्री.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  बालगंधर्व
  मधुवंती दांडेकर
  आशा खाडिलकर