A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रसिका मी कैसे गाऊ

रसिका, मी कैसे गाऊ गीत?
दाटून आले घन आसवांचे
मिटलेल्या पापणीत !

तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा
नाचे प्रलय लयीत !

मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी
रडते स्वप्‍न व्यथीत !
गीत - वंदना विटणकर
संगीत - अनिल-अरुण
स्वर- अनुराधा पौडवाल
गीत प्रकार - भावगीत
'शोधिसी मानवा' हे गाणं लिहिल्यावर माझ्या लक्षात आलं की चालीवर गाणं लिहिणं हा तर शब्दस्वरांचा खेळ आहे. शब्दांवर प्रेम असलं, नादाशी मैत्री जमली आणि लयीचा पदन्यास आवडला तर गीतरचना करणं आनंददायकच वाटणार. त्यात कारागिरी असेल पण ती आव्हानात्मक आहे. या कारागिरीतून नवीन आकृतिबंध सापडतात. शब्दांची नवनवीन रचना करण्याचा आनंद अनुभवता येतो. शब्दांचं भांडार आणि रचनेचं सामर्थ्य असलेल्या कवीला हे आव्हान सहज पेलता येतं. चालीचा तांत्रिक रुक्षपणा जाणवू न देता गाण्यातलं काव्य फुलविण्याची चतुराई असली तर चांगलं गाणं ही चांगली कविता होऊ शकते. अर्थात चालीवर गाणी लिहिताना कवीच्या कल्पनास्वातंत्र्यावर बंधन येतं हेही खरं आहे. तरीही नवीन आव्हान म्हणून मी त्यानंतरची बहुतेक गाणी चालीवर लिहिली. प्रत्येक संगीतकाराच्या विविधरंगी स्वररचनांवर शब्दांची नक्षी कोरताना वेगळाच आनंद वाटला.

कारागिरी असली तरी तिच्यासाठी योग्य मन:स्थिती असावीच लागते. एकदा याच कारणामुळे माझं गाणं अडून बसलं. संगीतकार अनिल-अरुण यांच्या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण ठरलं होतं. अरुण पौडवाल यांनी सुंदर चाल बांधली होती. ध्वनिमुद्रणाची तारीख येऊन ठेपली तरी माझं गाणं तयार होईना. कारण माझे पती चंद्रकांत विटणकर यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. माझं चित्त थार्‍यावर नव्हतं. त्यांच्या काळजीनं ग्रासलेलं मन गाणं लिहायला तयार होईना. मी अरुणजींना फोन करून सांगितलं, "माझ्याकडून गाणं लिहून होणार नाही. नाइलाज आहे माझा. तुम्ही कृपा करून दुसर्‍या कवीकडून गाणं लिहून घ्या आणि ध्वनिमुद्रण पार पाडा."
अरुणजी शांतपणे म्हणाले, "वंदनाताई, मला गाणं तुमच्याकडूनच हवं आहे. तुमची मन:स्थिती मी समजू शकतो. पण प्रयत्‍न तर करा. मला खात्री आहे की तुम्ही गाणं लिहाल."
"अहो, कसं शक्य आहे? कसं लिहू गाणं? काही सुचत नाहीये."
ते उत्तरले, "असंच काहीतरी लिहा. 'कसं लिहू गाणं वगैरे.' "

मी सुन्‍नपणे विटणकरांच्या शेजारी येऊन बसले. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी होती. अजून ते गुंगीतच होते. काय होईल? ही चिंता मनात दाटलेली. सहज विचार आला, रसिक श्रोते गाणं ऐकतात. शब्दांच्या आणि स्वरांच्या सौंदर्यानं धुंद होतात. पण गाणं लिहितानाची कवीची मन:स्थिती त्यांना कळत असेल का? हा विचार मनात येताच काय झालं कुणास ठाऊक, वीज चमकावी तशा मला गाण्याच्या ओळी सुचल्या.

रसिका, मी कैसे गाऊ गीत?
दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापणीत !

ती ओळ सुचताच मन एका अनामिक भावनेने थरारून गेलं ! त्या मन:स्थितीतही भरभरून आनंद झाला. त्याच भारलेल्या तंद्रीत गाण्याची पुढची कडवी लिहून झाली. खरंच, अशावेळी वाटतं, हे सारं आपण नाही करीत. कुणीतरी आपल्याकडून करवून घेतं ! मी लगेच अरुणजींना फोन केला नि संपूर्ण गाणं फोनवरूनच वाचून दाखवलं.
खूष होऊन ते उद्गारले, "वा ! किती छान लिहिलंत हो गाणं ! शब्द इतके भावपूर्ण आहेत की ऐकताना मला नवीन जागा सुचल्या. थांबा. गाणं लिहून घेतो."

रुग्णालयाच्या फोनवरून एका कवीनं संगीतकाराला ऐकवलेलं, गाण्यांच्या इतिहासातलं हे बहुधा पहिलंच गाणं असेल ! अनुराधा पौड्वाल यांनी अत्यंत समरसतेनं गायलेलं हे गाणं खूप लोकप्रिय झालं. याचं श्रेय अरुण पौडवाल यांनाच आहे.
(संपादित)

वंदना विटणकर
'हे गीत जीवनाचे' या वंदना विटणकर लिखित गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.