A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले-
होता हृदयाची दो शकले जखमेतून क्रंदन पाझरले-
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला नकळे, अवसेत कधी का तम उजळे-
संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले-
किमया असली का केलि कुणी
गीत - यशवंत देव
संगीत - प्रभाकर जोग
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भावगीत
क्रंदन - आकांत.
तम - अंधकार.
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
संजीवन - पुनुरुज्‍जीवन.
असाच एकदा फोर्टमधून बसने दादरला येत होतो. अचानक एक सुरावट डोक्यात आली. स्वत:शीच गुणगुणत तिचे बसच्या तिकिटाच्या मागील बाजूस नोटेशन लिहिले. घरी आल्यावर पेटी घेऊन ती म्हणून पाहिली. तिच्यावर शब्द लिहिले तर छान गाणे तयार होईल असे वाटले. मग त्याकरता कवीचा शोध घेणे आलेच. कसे कुणास ठाऊक, माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम नाव आले ते यशवंत देवांचे. ते उत्तम संगीतकार जसे आहेत तसे चांगले कवीही आहेत. म्हणून त्यांना ती स्वरावली ऐकवण्यासाठी त्यांच्या घरी गेलो तेव्हा समजले की त्यांची मुंबई आकाशवाणीतून नागपूर आकाशवाणीवर बदली झाली आहे.

काय करावे, विचार करू लागले. मग एक गंमतशीर विचार मनात आला. इनलॅंड लेटर घेतले. त्यावर माझी स्वरावली लिहिली. एखाद्या व्यक्तीचा एकाकीपणासारखा भाव प्रकट होईल अशी शब्दरचना, कविता त्या चालीवर लिहून द्यावे असे विनंतीवजा पत्र नागपूरला देवांकडे पाठवून दिले. आणि काय आश्चर्य, आठच दिवसांनी नागपूरहून देवांनी माझ्या चालीवर शब्द लिहून पाठवले.

स्वर आले दुरुनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी..

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.