ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या अनेक अभंगांचे संग्रह गेल्या कित्येक वर्षांपासून निघत आहेत. त्यांतील (थोरले) सातारकर महाराजांच्या 'सकल संत गाथा'; जुन्या काळातील 'सर्वसंग्रह' आणि त्या जातीतील गो. नी. दांडेकर प्रभूर्तीचे 'भक्तिमार्गप्रदीप' इत्यादी प्रसिद्ध आहेत.
या ग्रंथांतून ज्ञानेश्वरलिखित अनेक अभंग प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यातील काही अभंगांच्या मूळ कवीबद्दल संदेह निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दांडेकरांच्या 'भक्तिमार्गप्रदीप'मध्ये कसोशीने ज्ञानेश्वरांनीच मुळात लिहिलेले अभंग दिले आहेत. परंतु वारकर्यांच्या संग्रहातून गोळा करून एकत्र दिलेल्या अनेक संग्रहांत हे तारतम्य राहिलेले नाही. काही वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांच्या पदांचा अभ्यास करताना पंडित आवळीकर यांच्या दृष्टोत्पत्तीस आलेली अशी एक हकीकत लिहिली, ती महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या २२ जानेवारी १९७८ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या अंकात दिली आहे. 'ज्ञानदेवांचे (?) एक कूट पद' या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या लेखात कै. वामन दाजी ओक संपादित 'काव्यसंग्रहा'च्या तेराव्या पुराणाचा 'अनेक कविकृत पदे, कटाव, लावण्या' असलेल्या 'पदसंग्रह' भाग पहिल्याचा संदर्भ देऊन असे प्रतिपादिले होते की,
"या संकलनात ज्ञानदेवांची २२ पदे आहेत. ही सर्व रचना ज्ञानदेवांचीच आहे काय, हा प्रश्न ही पदे वाचताना पदोपदी आपल्यापुढे उभा राहात असतो. ज्ञानदेवांच्या शंकास्पद (Apocryphal) वाङ्मयात त्यांची गणना करावी लागेल असा विचार माझ्या मनात येतो. या बावीस पदांत 'काट्याच्या अणिवर वसति तीन गाव (दोन ओसाड, एक वसेचि ना) या नावाचे एक कूट पद आहे. या पदाची जात भारूडाची आहे. पदाच्या अखेरीस 'ज्ञानदेव म्हणे' असा उल्लेखही आहे. पण तेवढ्या आधारावर हे पद ज्ञानदेवांचे आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या पदाची भाषाही ज्ञानदेवकालीन किंवा /आणि ज्ञानदेवांची आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे."
त्यानंतर या लेखात त्या गीताची संहिता दिलेली असून म्हटले आहे की, हे पद परंपरेने ज्ञानदेवांचे मानले गेले आहे. आजही भजनी मंडळी ज्ञानदेवांचे म्हणूनच हे पद गाताना दिसतात.
या लेखाच्या पुढील भागात हे गीत ज्ञानेश्वरांचे मानण्यात भाषेची होणारी अडचण, ज्ञानेश्वर करणार नाहीत अशा 'रुपये 'सारख्या अर्वाचीन शब्दाचा उपयोग इत्यादीसंबंधीचा उल्लेख करून अगदी याच ज्ञानेश्वरांच्या गीताच्या अर्थाचे कवि पुरंदर दासांचे एक संपूर्ण कन्नड पद मराठी अर्थासह दिले आहे. त्या कन्नड गीताच्या पहिल्या ओळी आहेत-
मुळ्ळ कोनेय मेले मुरू केटेय कट्टी ।
यर्दु बरिदु, वंदु सुंदळिल्ल ॥
(काट्याच्या टोकावर तीन तळी बांधली । दोन कोरडी, एक भरलेच नाही ॥)
आपल्या स्फुट रचनेत शेवटी 'बापरखुमादेवीवरू' असा स्वनामनिर्देश करण्याचा ज्ञानदेवांचा प्रघात पाहता या पदातील 'ज्ञानदेव म्हणे' ही मुद्रिका या पदाला ज्ञानेदवांच्या शंकास्पद वाङ्मयात ढकलते, असे सरतेशेवटी या लेखात प्रतिपादन करण्यात आले आहे.
ज्ञानदेवांच्या नाममुद्रांचे स्वरूप
श्रीज्ञानदेवांचे आजपर्यंत उपलब्ध अभंग ११२१ आहेत. श्री. प्र. न. जोशी यांचा 'सार्थ श्रीज्ञानदेव अभंगगाथा आवृत्ती दुसरी' यात आतापर्यंत उपलब्ध असलेले, ज्ञानदेवांचे म्हणून जे अभंग आहेत त्या अभंगांत चार प्रकारच्या नाममुद्रा आढळतात.
१. 'बापरखुमादेवीवरू विठ्ठलु' किंवा 'बापरखुमादेवीवर विठ्ठल' (सुमारे पाचशेदा)
२. ज्ञानदेव (अडुसष्टदा)
३. ज्ञानेश्वर (अडुसष्टदा)
४. निवृत्तिदासु (एकवीसदा)
यापैकी 'बापरखुमादेवीवरू विठ्ठलु' ही सर्वांत जास्त वेळा आलेली नाममुद्रा ज्या अभंगात आहे ते अभंग सर्वांगसुंदर आहेत. विशेषतः काव्यदृष्ट्या सरस आहेत. आणि उपमा, दृष्टांत, शब्दरचनेचे सौंदर्य यात ते ज्ञानेश्वरीतील ओव्यांशी बरोबरी करतात. ज्या अभंगात 'बापरखुमादेवीवरू' ही नाममुद्रा आहे त्याच्या मागेपुढे ज्ञानदेवांचे नाव कुठल्याही प्रकारे म्हणजे ज्ञाना, ज्ञानिया, ज्ञानोबा, ज्ञानेश्वर वगैरे सहसा येत नाही. स्वतः 'ज्ञानदेव' या रचनाकाराच्या जागीच 'बापरखुमादेवीवरू विठ्ठल' अशी नाममुद्रा येते. यात बाप आणि रखुमादेवीवर ही दोन विशेषणे आहेत. ती अर्थात विठ्ठलाचीच आहेत..."
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'भावगीतकार ज्ञानेश्वर' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सुदिन ग्रंथ प्रकाशन, पुणे.
इतर संदर्भ लेख
संत एकनाथाच्या रचनांमधली ही एक प्रसिद्ध रचना खूप स्तिमित थक्क करणारी. "नाथाघरची उलटी खूण" हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे तो याच कारणावरून. अत्यंत विरुद्ध अशा रूपकांनी जीवनाची अर्थहीन विसंगती दाखवणारी रचना याआधी फक्त संत मुक्ताबाईंनी रचली. चारी भावंडे प्रतिभाशाली, पण त्यातली मुक्ताबाईंनी "मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी" ही रचना लिहून एक अभिनव रचना मराठी साहित्यात आणली. अतिशयोक्ती किंवा परस्परविरुद्ध विसंगती व रूपक याने जीवनाचं एक वेगळं तत्त्वज्ञानच तिने मांडलं. ज्याला आणखी वेगळं स्वरूप संत एकनाथानं दिलं.
जे कदापि शक्य नाही अशा गोष्टी - अतार्किक - आणि असंभव आणि त्याचवेळी त्या अर्थहीनही असण्याची शक्यता जास्त. जीवन आणि माणूस तरी काय आहे? अतार्किक - असंभव - अन् अर्थहीन !! पूर्ण आयुष्य घालवून जे सत्य कळतं त्याचा नंतरच्या आयुष्यात फारसा उपयोग नसतो. म्हणजे अर्थहीनच ! "दोन कच्चे एक शिजेचिना !"
माणूस अपरिपक्व असतो आधी, पण नंतर तो परिपक्व होईलच हे सांगता येत नाही. तसंही एखाद्याला वाटलं की, आपण आता पूर्ण शहाणे झालोत, पण जगाच्या दृष्टीनं तो अव्वल दर्जाचा मूर्खही असू शकतो !
ॲब्सर्डिटी हा साहित्यातील एक दुर्लक्षित असलेला वाड्मय प्रकार जो नंतर परदेशात अल्बर्ट कामू आणि फ्रान्झ काफ्का यांनी आणला, पण त्या आधी कितीतरी आधी हिंदुस्थानी तत्त्वज्ञानात तो आला आहे. उपनिषदे, वेदांची सुरुवातच 'मी'चा शोध - अस्तित्व का आहे? याचा कर्ता कोण? यापासून झाली. ते 'कोहम्? कोहम्?' असं विचारत थेट 'अहम् ब्रह्मासी' इथपर्यंत ! अर्थात 'मीच ब्रह्म आहे' असं म्हणूनही सत्य वेगळेच आहे हे निसर्ग जाणवून देतो की आपल्या जीवनावर, इच्छेवर, मनावर, बुद्धीवर, शरीरावरसुद्धा पूर्णपणे आपला अधिकार नसतो ! ही स्वायत्तता अस्तित्वाची क्षणभंगूर, अशाश्वत अन् दांभिक आहे, हे जाणवते तेव्हाच 'दोन ओसाड एक वसेचिना' ही ओळ जन्माला येते. या सर्व ओळी वाचताना त्यात आणखी आणखी अर्थ सापडतात वेगवेगळे !
कुठलंच ज्ञान परिपूर्ण नसतं. तरीही आपण शोधत जातो. आपण स्वतःला शोधतो – सुखाला शोधतो… पूर्वजांचे प्रश्न, त्यांची उत्तरं शोधतो – आणि तरीही आपण असंतुष्ट, तुटलेले आणि असमाधानी असतो.
गुहेत राहत दगडांची हत्यारं करणार्या आदिमानवापासून आतापर्यंतचा मानवी प्रवास थक्क करणारा असला तरीही या अस्तित्वाचं कारण काय न् शेवटी एकमेकांवर अणुवर्षाव करून समग्र पसारा क्षणार्धात नष्ट करण्याचं आपलं कसब ! याचा अर्थ काय?
व्यक्ती आणि समाज हे एकमेकांना परस्परपूरक असतात. म्हणूनच आधी टोळ्या न् नंतर समाज, नंतर देश नावाची संज्ञा निर्माण झाली. सुरक्षित न् सुखी होण्याचे माणसाचे आटोकाट प्रयत्न… न् तरीही आपण सुरक्षित नाही की सुखीही नाही… आपण दुःखांच्या काट्यांवर स्वप्नांची गावं वसवतो. आपण बुद्धीनं विचारानं कधी पंगू होऊन जातो, पण तरीही धडपडतो… प्रयत्न करतो. धान्य कच्चेच काय, पूर्ण जळून कोळसा होतो तरीही आपण पुन्हा चूल पेटवून स्वप्नं, भावना, विचार शिजवतच राहतो. हा निरुपाय, ही असहायता आहे की अविरत प्रयत्नांची कौतुकास्पद शर्थ?
सिसिफसच्या असंबद्ध निरर्थक गोष्टीतल्यासारखं ! देवांनी दिलेली शिक्षा म्हणून सिसिफस प्रचंड शिळा अथक प्रयत्न करून डोंगराच्या माथ्यावर नेऊन ठेवतो.. ती शिळा डोंगरावरून पुन्हा गडगडत खाली येते ! पुन्हा तो ती उचलतो - पुन्हा ती गडगडत खाली - न् हे चालूच राहतं ! हीच ती शिक्षा !
आपण सगळेच जण ही निरर्थक शिक्षा भोगत आहोत का? की आपण काट्याच्या अणीवर पण मस्त गाव वसवत तांदूळ शोधतोय? न् यातच आपण खुश आहोत का? जसं मुक्ताबाईंची मुंगी आकाशी उडून सूर्याला पण गिळू शकते तसं आपणही काट्याच्या अणीवर राहूच शकतो आणि तरीही हसत हसत कच्चे धान्य खात पोट भरलंय असं म्हणूही शकतो !
काहीही होऊ शकतं ! फक्त त्याचा अर्थ न् कारण परंपरा शोधायची राह्यली एवढंच !
(संपादित)
मल्लिका अमरशेख
सौजन्य- दै. सामना (१ डिसेंबर २०१९)
(Referenced page was accessed on 15 April 2020)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
काट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना !
वसेचिना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एका घडेचिना !
घडेचिना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेचिना !
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुगे दोन हिरवे एक शिजेचिना !
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना !
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फळेचिना !
फळेचिना तीला झाले तीन टोणगे दोन मेले एक जगेचिना !
जगेचिना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना !
चालेचिना तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेचिना !
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेचिना !
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरुवाचून कळेचिना !
सद्गुरु मिळेपर्यंत ज्ञानबाची "मेख" हाती लागणे अवघडच म्हणा पण तरीही पद [कीं वात्रटिका?] वाचतांना मजा वाटते ना?
कर्नाटकचा पुरंदरदास हा संत कवी काही काळ पंढरपूरास रहात होता. त्याने लिहलेल्या एका कवितेचा अनुवाद आमचे मित्र श्री. प्रभाकर नानावटी यांनी दिला आहे. तोही येथे बघा.
काट्याच्या टोकावर दोन तळे बांधली
दोन रिकामी, व एक भरले नाही ॥
न भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले
दोघे लंगडे, व एकाला पाय नाही ॥
पाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले
दोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ॥
वासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले
दोन खोटे, व एक चालत नाही ॥
न चालणार्या नाण्यासाठी तिघे आले
त्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ॥
न दिसणार्याला तीन गावांचे दान मिळाले
दोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ॥
शेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले
दोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ॥
हात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली
दोन फुटके व एकाला तळच नव्हते ॥
बिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले
दोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ॥
न शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले
दोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ॥
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे
इतर कुणालाही ते कळणार नाही ॥
ही कविता ज्ञानेश्वरमहाराजांची नसण्याची शक्यता आहे; (रुपयाचा उल्लेख) पण ती गाथेत सापडते, आपण फक्त आस्वाद घेण्यापुरते पहा.
(संपादित)
शरद
* या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास aathavanitli.gani@gmail.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.)
सौजन्य- misalpav.com (१२ सप्टेंबर २०१०)
(Referenced page was accessed on 15 January 2020)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.