A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कितीक काळ हालला

कितीक काळ हालला
असा तुझ्याविना
कळे न श्वास चालला
कसा तुझ्याविना

दहिंवरल्या प्रहरातून
वाट पाहते पहाट
बहर गळे दरवळला
कसा तुझ्याविना

लवथवत्या पानावर
गहिवरते भरदुपार
ज्वरभरला दिवस ढळे
कसा तुझ्याविना

तमामधुन सावकाश
उजळे आकाश निळे
चळे उदास चंद्रमा
कसा तुझ्याविना

तार्‍यांचा धरून भार
रात्रिस उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे
कसा तुझ्याविना !
गीत - कवी अनिल
संगीत - सुधीर मोघे
स्वर- देवकी पंडित
गीत प्रकार - कविता, भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २५ एप्रिल १९७४, नागपूर.
दहिंवर - दंव.
काळ पुढे सरकत असतो. एखाद्या दिवशी साथ हरवल्याची भावना कमी तीव्र होते. पण ती संपूर्णपणे नाहीशी कशी होणार?
कितीक काळ हालला असा तुझ्याविना

"कित्येकदा 'तुझ्याविना' आयुष्य पुढं सरकलं कसं, याचं आश्चर्य बाटतं. आश्चर्य. तक्रारी नाहीत. त्याही करता आल्या असत्या. पण तक्रारी न करता अगदी सहज म्हणावंसं वाटलं,
कितीक काळ हालला असा तुझ्याविना
कळे न श्वास चालला कसा तुझ्याविना

या दोन ओळी सुचल्यानंतर दोन तास थांबलो. मनात फक्त त्या ओळी. तिसरी ओळही अशीच अचानक सुचली :
दहिवरल्या प्रहरातुन वाट पाहते पहाट
या ओळीत शब्दांचं संगीत आहे. सकाळचा प्रहर दंवानं भिजलेला- म्हणजे इथं अश्रूंची सूचना आहे. दरवळलेला बहर गळतो आहे.

बहर गळे दरवळला कसा तुझ्याविना
या ठिकाणी 'कसा' म्हणजे 'कशा प्रकारे' असाही अर्थ अन् 'याचं कारण काय?' असाही अर्थ. आता सकाळनंतर दुपार. हा काळाचा क्रम आपोआप आला. सबंध कवितेत तो आहे पाहा.
लवथवत्या पानावर गहिवरते भरदुपार

.. ही दुपार पानांना 'लवथवती' करणारी- हा शब्द 'लवथवती विक्राळा' या आरतीतला- पण तीच तेव्हा गहिवरते. पुन्हा थांबलो. हिच्या तोडीची दुसरी ओळ सुचणं कठीण वाटलं. पण ती गळाला लागली.
ज्वरभरला दिवस ढळे कसा तुझ्याविना

'ज्वर' का? तर These were days of feverish activity. दिवस ढळला. अंधार आला ..
तमामधुन सावकाश उजळे आकाश निळे

आता या ओळींचा अर्थ काय? तर दुःखाचं साचलेलं तम निवळतं. हळूहळू उजळू लागतं. It takes its own time to clear up.
चळे उदास चंद्रमा कसा तुझ्याविना

इथं 'चळे'ला दोन अर्थ आहेत. एक तो 'मोहात पडलेला' असा; अन् दुसरा 'तो सैरभैर झाला आहे' असा. आता शेवटच्या दोन ओळी लिहिणं हे मोठंच आव्हान होतं. म्हटलं, घाई करण्यात अर्थ नाही. एक दिवस थांबल्यानंतर पुन्हा त्या ओळी गळाला लागल्या :
तार्‍यांचा धरुन भार रात्रिस उरते न त्राण
स्मरणावर प्राण जळे कसा तुझ्याविना !

.. रात्र. एरवी ती तार्‍यांचा भार सहन करते. पण आज मात्र तिला ते त्राण उरलेलं नाही. आणि शेवटच्या ओळीतील 'स्मरण' हा शब्द पाहा. 'सरण' या शब्दाचे प्रतिध्वनी उठवणारा. शेवटची ओळ सुचल्यावर पाठ थोपटून घ्यावीशी वाटली."

मी मूक झाले होते. भूतकाळाकडे मागे वळून पाहणार्‍या, स्वतःचे एकटेपण सांगणार्‍या, आणखीही काही दशपद्या आठवत होत्या. त्यांचे भावनिक संदर्भ आठवत होते. त्यामुळे उदास झाले होते. पण नंतर वाटले, हा कवी कुठे उदास आहे? तो कुठे कुढतो आहे? त्याने आपला जीवनप्रवास आनंदाने केला आहे. काटेही फुलांसारखे वेचावे, हे त्याचे तत्त्वज्ञान आहे. कधी मेळ्यात रमावे, कधी आपलीच सोबत शोधावी; आधीचा प्रसाद घ्यावा, पुढची साद ऐकावी; चुकावे आणि सावरावे… आणि कधीतरी खांद्यावर बाळगलेले सुखदुःखांचे ओझे फेकून देऊन परत निघून जावे… यात कठीण काय आहे? फक्त 'नसे मुमुक्षु, मुक्त मी' हा विश्वास हवा. तो असला की कोणतेही तीव्र आघात पेलण्याचे सामर्थ्य येते. अनिलांनी हा विश्वास बाळगला; आपल्या कवितेतून इतरांना तो दिला.

हारल्याची जाणीव अधूनमधून होतेच; एखाद्या क्षणी 'सारेच दीप कसे मंदावले आता !' असेही वाटते. पण अशा मनःस्थितीत एखादी चांगली कविता वाचनात येते. अभ्रे वितळू लागतात. सगळे स्वच्छ, नितळ वाटते. 'तमामधुन सावकाश उजळे आकाश निळे'.

दोन वर्षांपूर्वी, तो प्रवास आणि ते मनमोकळे संभाषण संपवताना मला अगदी असेच वाटत होते. सारेच दीप उजळल्यासारखे. वाटले, अनिलांना हे सांगावे. पण त्या वेळी सांगितले नाही. आज मात्र सांगावेसे वाटते आहे : हे उजळलेले क्षण तुम्ही आम्हाला दिलेत. आम्हाला आणखी काय हवे आहे? आणि तुम्हाला तरी आणखी काय हवे असणार आहे?
(संपादित)

विजया राजाध्यक्ष
दशपदी : पदचर्या (एका रेल्वे प्रवासातील अनौपचारिक आणि मनमोकळ्या संवादातून उलगडत गेलेले कवी अनिलांचे काव्यविश्व आणि भावविश्व.)

कवी अनिल यांची संपूर्ण कविता. संपादक - श्याम माधव धोंड. या पुस्तकातून.
सौजन्य- विजय प्रकाशन, नागपूर

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.