तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे
स्पर्श हा तुझा प्रिया या जगांत या क्षणी
सौख्य अर्पितो मला अमृतात न्हाउनी
स्वप्न पाहता नवे पापणी हळू लवे
वेल बहरुनी वरी गंध फेकिते कळी
प्रीत याहुनी नसे या जगात वेगळी
हात हा तुझा सखे जोवरी न सोडवे
मुग्ध भावनेतले गीत आज रंगुनी
धुंद प्रीत आळवी वेगळ्या सुरांतुनी
अर्थ तोच शब्दही जे तुला मला हवे
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी, सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | भावगीत, युगुलगीत |
लवणे | - | वाकणे. |
बर्याच संगीतकारांनी रागांवर आधारित बरीच गाणी बसवलेली आहेत. सुधीर फडके यांनी तर एकाच यमन रागावर कैक गाणी बेतलेली आहेत. ती सर्व गाणी सुंदर असून प्रत्येक गाणं वेगळं वाटतं. मी त्यापैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या अनेक गाण्यामधे जास्तीतजास्त रागांचा उपयोग केलेला आहे. याच बरोबर मी असा विचार केला की आपण सर्व गाणी रागदारीवर बसवली तर तसा शिक्का माझ्यावर बसेल. आपल्याला असा छाप बसता कामा नये. मग काही गाणी कॉर्डस् सिस्टीमवर तयार केली.
कुठल्याही पट्टीचा सा-ग-प पकडायचा अन् त्यावर चाल बांधायची. शब्द जर तसे असतील तर चाल बरोबर सुचते. आता पाहा-
पांढरी एकचा स्वर पकडला तर त्याचा सा-ग-प काळी एकमध्ये रे-म-ध होईल. तेच काळी तीनमध्ये म-नि-रे होईल.
नुसत्या सा-ग-प वर कशी चाल बांधणार? तुम्ही सा-ग-प डोक्यात पक्का धरून ठेवायचा. मग नुसताच कुठेतरी एकटा बसलो असेन, तिथे मला सुचली तर तबला पेटी बरोबर नसताना तुम्ही कसं काय करणार? पण सर्व विचार डोक्यात असतात. तबलजी नसला तरी रूपकचा ठेका मनात चालू असतो. 'तिन् तिना धिना धिना, तिन् तिना धिना धिना'. मग फक्त मात्रा १-२-३-१-२-३-४ च्या आधारे मनात ताल चालू असतो. स्वरांचा भरणा डोक्यात असतोच. तसंच निरनिराळे कॉर्डस् वाजत असतात. अशा पद्धतीने केलेलं माझं एक गाणं खूप लोकप्रिय झालं.
मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे
तू जिथे तिथे तुझी धुंद मी तुझ्यासवे
यात फक्त कॉर्डस् आहेत. यात कुठल्याही रागाचा विचार केलेला नाही. तरी पण शेवटी जे संस्कार मनावर झालेले आहेत, त्याचा परिणाम म्हणून यात कुठेतरी रागाचा भास होईल. आम्ही जरी कॉर्डस् पकडून गाणं केलं तरी सवयीप्रमाणे आम्ही त्याच पद्धतीने जाणार हे अपरिहार्य आहे.
'मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे' हे म्हणताना यात हमिंग कसं घ्यायला पाहिजे, ते कसं घेतलं तर आकर्षक वाटेल, या गोष्टीचा विचार एकट्या संगीत दिग्दर्शकाने करायचा असतो. शिवाय मधल्या म्युझिक पीसेसला कोणतं वाद्यं वापरायचं याचाही विचार तोच करतो.
हल्ली म्युझिक अरेंजर नेमण्याची पद्धत निघाली आहे. आमच्या काळात असं नव्हतं. अरेंज आम्हीच करायचं. आम्हीच सगळं गाणं बसवायचं. माझं कॉर्डस् पद्धतीचं आणखी एक गाणं म्हणजे-
नकळत सारे घडले
मी वळता पाऊल अडले
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली