A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सरयू तीरावरी अयोध्या

सरयू तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी

घराघरावर रत्‍नतोरणें
अवतीभंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी

स्त्रीया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल-दीपक
नृशंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी

तिघी स्त्रीयांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी

शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी

राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य - धनाचें?
कल्पतरूला फूल नसे कां? वसंत सरला तरी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र देसकार
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ८/४/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी जोशी.
अभ्यंतर - अंतरात्मा / आतील भाग.
आर्या - श्रेष्ठ स्‍त्री.
इक्ष्वाकु कुल - सूर्यवंश.
उपवन - बाग, उद्यान.
कल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
नृशंस - क्रूर.
प्रभा - तेज / प्रकाश.
बहुश्रुत - अनेक विषयांची माहिती असलेली व्यक्ती.
भार्या - पत्‍नी.
वाजी - अश्व.
संगर - युद्ध.
गीतरामायण, गदिमा आणि शेक्सपिअर

गीतरामायणाचा हीरक महोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. ही कलाकृती म्हणजे प्रतिभेचा अतुलनीय आविष्कार आहे. तसेच तीने लोकप्रियतेचेही उत्तुंग शिखर गाठलं आहे. गेली चार पिढ्या आणि सहा दशकं गीतरामायण मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि पुढील अनेक शतके गाजवेल हेही निश्चित आहे. यातील हनुमंताच्या तोंडी असलेल्या ओळींमध्ये छोटासा बदल करून असं म्हणता येईल,
जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन (गीत)रामायण

गीतरामायणाच्या शाश्वततेवर इतका ठाम विश्वास जेव्हा एवढा मोठा जनसमुदाय एकमताने ठेवतो, तेव्हा या विश्वासाचा आधार, वैश्विक पातळीवरील काही कलाकृतींमध्ये शोधता येतो का? असा एक विचार मनात आला. असं साहित्य, ज्यास शब्दश: शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ज्यास जन-सामान्यांइतकीच भाषाप्रभूंची मान्यता आहे. अर्थात शेक्सपिअरपेक्षा मोठं नाव समोर येईना.

शेक्सपिअरचे लिखाण साधारणत: इ.स १५९० ते १६१३ या काळातले. इंग्रजी भाषेतले. तात्कालीन आंग्ल संस्कृतीचा प्रभाव आणि संदर्भित विषय असलेले. त्यामुळे गदिमांच्या गीतरामायणाशी त्याचे, ना विषयाचे ना संस्कृतीचे साम्य. पण दोन्हींमध्ये काही समान धागे आहेत. तसं आधुनिक काम आहे, सर्वमान्य आहे आणि कॅलेंडरची पानं झुगारून देण्याची क्षमता आहे. या अनुषंगाने गीतरामायण व शेक्सपिसरीअन साहित्य, यात शैलीची काही साम्यस्थळं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्‍न आहे.

शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या एकूण ३८ नाटकांपैकी ३४ नाटकांची बीजे / कथासूत्रे किंवा नाटक म्हणूनही, त्यांच्या आधी लिहिलेले होते. जसे रोमिओ-ज्युलिएट हे आर्थर ब्रूक यांनी १५६२ मध्ये लिहिले होते. किंग लिअर, मॅकबेथ इ. हॉलिंशेड्स्‌ क्रॉनिकल्स्‌ मध्ये १५८७ मधे ‍प्रकाशित झालेले होते. याची सप्रमाण माहिती उपलब्ध आहे. पण या मूळ कथाविष्कारांवर शेक्सपिअर यांनी आपल्या शब्दसंपन्‍नतेची अशी काही झळाळी चढवली की काळाचा ओरखडा त्यांवर ओढणे केवळ अशक्य.
रामकथेस हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक व्यक्तींनी, विविध भाषांमधून, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती समर्थपणे मांडली आहे. वाल्मीकी, तुलसीदास, मोरोपंत ही त्यातील काही मोजकी, ठोस नावे. गदिमांनी या असंख्य वेळा अभिव्यक्त झालेल्या रामकथेचे, गीतरामायणाच्या रुपाने सोने केले ते निव्वळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर. शब्दांची नादमधूर मांडणी, पटकथेसारखा असलेला कथानकाचा नाट्य / चित्रमय बहाव, यांच्या बळावर गीतरामायण दीर्घायू.. चिरायु हे होणारच.

शेक्सपिअर हे त्यांच्या नाटकांसाठी जरी प्रामुख्याने ओळखले जात असले तरी त्यांचे वर्णन प्रथमत: कवी आणि मग नाटककार असे करता येईल. त्यांनी कविता / सुनितें (sonnets) ही कारर्किर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिली. नंतरच्या काळात काव्य, त्यांच्या नाटकांचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापू लागले. त्यांच्या काव्यात जात्याच स्वर-तालांचा मेळ असतो. हा परिणाम साधण्यासाठी त्यांनी जी अनेक तंत्रे वापरली त्यातील एक प्रमूख तंत्र alliteration म्हणजे अनुप्रासांचा सुयोग्य आणि चौफेर वापर, हे होय. उदा.
१. "For as you were, when first your eye I eyed" (Sonnet 104)
२. "When to sessions of sweet silent thought
I summon up remembrance of things past" (Sonnet 30)
गदिमांच्या गीतरामायणातही नादांची गुंफण, ताल-स्वरांचे गुंजन भरून ओसंडते आहे. त्यांनीही अनुप्रासांचा भरगच्च वापर केला आहे. कुठलाही अट्टहास न करता, शब्दांचा सहज सुंदर खेळ करत हे साधणं, ही माडगूळकरांची signature style आहे. याची काही मोजकी उदाहरणे-
१. "कैक कैकयी करी नवसासी"
२. "दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला"
३. "जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात"
४. "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट.. प्रभुचे लोचन पाणावती.."

अनुप्रासांचा मंजुळ खेळ जर श्रुति सुखावण्यासाठी आहे तर रूपकांचा (metaphor) प्रभावी वापर चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी.. शब्दचित्राचे रंग गडद आणि गहिरे करण्यासाठी. Sonnet 73 मध्ये वार्ध्यक्यासाठी हेमंती निष्पर्णतेचे रूपक शेक्सपिअर यांनी वापरले आहे. ते म्हणतात,
"That time of year thou mayst in me behold
When yellow leaves, or none, or few do hang"
अयोध्येच्या प्रजाजनांच्या नजरेतून आदर्श असा जो नृपती- राजा दशरथ याचे वर्णन करताना गदिमांनी कल्पतरूचे रूपक वापरले आहे. ते म्हणतात,
"कल्पतरूला फूल नसे कां? वसंत सरला तरी"
रूपकाचे आणिक काही गदिमा स्पर्श-
जेव्हा भरत कैकयीला विचारतो, "शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ".
वाल्मीकींचे शिष्य म्हणून लव-कुश, "ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल.. वसंत-वैभव गाते कोकिल"

'हॅम्लेट'च्या आधीचे शेक्सपिअर यांचे लिखाण काहिसे अलंकारीक, शब्दबंबाळ वाटते. तो त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मात्र साध्या, सोप्या, गेयता नसलेल्या शब्दांचा वापर सढळ आहे. अगदी टोकाची भावना व्यक्त करताना सुद्धा.. जसे राग, त्वेष, संताप. 'किंग लिअर' या नाटकात, किंग लिअर आपली मोठी मुलगी गोनरील हिला म्हणतो, (जिने त्याचे राज्य घेऊन, त्याला घराबाहेर काढले आहे)
".. But yet thou art my flesh, my blood, my daughter; or rather a disease that's in my flesh, which I must needs call mine" (अंक २, प्रवेश ५)
आणि हेच तर नेमके आपल्या गदिमांचे वैशिष्ट्य आहे. कुठेही शब्दांचे अवडंबर नाही. नेमक्या, मोजक्या शब्दांचा सहजाविष्कार.. मग भावना कुठलीही असो. हेच पहा ना, 'माता न तूं, वैरिणी' मधे भरत कैकयीस म्हणतो,
"श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं"

शेक्सपिअर यांचे लिखाण आणि गदिमांचे गीतरामायण, यांच्यात आणखी एक महत्त्वाचे साम्य आहे, ज्याला इंग्रजीत coining a phrase म्हणतात. अनेक वाक्‍प्रचारांच्या / idioms च्या रुपात या दोघांनी आपल्या पावलांचे ठसे, त्यांच्या त्यांच्या भाषेवर उमटवले आहेत. ज्यांच्या लिखाणाने मुळातून भाषाच अधिक संपन्‍न व्हावी एवढे कर्तुत्व या दोघांचे आहे. अशा वाक्प्रचारांची यादी खरं तर खूप मोठी आहे. वानगीदाखल काही सांगायचे झाले तर,
शेक्सपिअर-
१. "all that glitters is not gold" (The Merchant of Venice)
२. "high time" (Comedy of Errors)
३. "what's done is done" (Macbeth)
गदिमा (गीतरामायणात)
१. "अभिषिक्तातें गुण वय नाहीं"
२. "अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात"
३. "दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट"

याच सूत्राचा आधार घेत शेवटी असं म्हणेन, आजचे माझे हे लिखाण हा.. एका मिणमिणत्या ज्योतीने, शब्दशारदेच्या आकाशातील या दोन तेजांची आरती करण्याचा एक नम्र प्रयत्‍न आहे.

(एप्रिल २०१५ मध्ये 'गीतरामायण' हीरक महोत्सवानिमित्त गदिमा प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित झालेल्या 'अवघ्या आशा श्रीरामार्पण' या स्मरणिकेत हा लेख छापून आलेला आहे.)

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण