एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?
अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजून मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?
उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यासारखा पण कोरडा उरलास का रे?
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
राग | - | बागेश्री |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
'रंग माझा वेगळा' या कवितासंग्रहापासून प्रतीकांची ही अर्थवाही नाट्यपूर्ण काव्यशैली सुरेश भटांनी हळूहळू हस्तगत केलेली दिसते, ज्या शैलीला पुढे तेज आणि धार चढली.
'तरुण आहे रात्र अजुनी' ही शुद्ध प्रेमभावनेला वाहिलेली गझल. या गझलेत एका मीलनोत्सुक प्रेमिकेची वेदना व्यक्त करण्यासाठी सुरेश भटांनी अतीव हळुवार, मुलायम, मृदुल भाषा आणि प्रतीके वापरली आहेत. पूर्ण शारीरिक मीलन होता होताच दुरावलेल्या प्रियकराला ती प्रणयिनी आतून खट्टू होऊन म्हणते-
अजूनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला
अजून मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?
या गझलेत अस्सल मराठी लावणीचा खट्याळ रुसवा आहे पण केवळ गझल वृत्ताचा वापर केल्याने, प्रतीकांची भाषा वापरल्याने या गीतातली देहोत्कटता गळून जाऊन केवळ मानसिक ओढीच्या पातळीवर हे प्रेमगीत जाऊन बसले आहे. गझलची भाषा पण अंतर्यामी गीतातले भाव, अशा स्वरूपाची ही भावकविता आहे.
(संपादित)
शिरीष पै
'सुरेश भट ह्यांची निवडक कविता' या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.