चरणी पावन फुले । स्वर्ग या विजनात
रसमय मंजुळ गीत गात मानस भरे
कमलदली जशी पुनवरात..
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | मीरा.....मधुरा ! |
राग | - | नंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
मानस | - | मन / चित्त / मानस सरोवर. |
विजन | - | ओसाड, निर्जन. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
माझ्या मनातली मीरादेवी प्रत्यक्ष इतिहासकाळात कशी घडली, वाढली ते मला ठाऊक नाही. (इतिहासाला तरी ठाऊक आहे का?) पण खचित की, मीरादेवीच्या वैवाहिक जीवनाबद्दल तिचे चरित्रकारही फारसा प्रकाश टाकू शकत नाहीत. मीरादेवीच्या हृदयात श्रीकृष्णदैवताबद्दल प्रणयाचा हा मधुर भाव केव्हा आणि कसा उपजला याबद्दल एकदोन प्रसंगातच तिचे बालपण सांगितले जाते. तिचा विवाह युवराज भोजराजाशी इ. स. १५१६ मध्ये झाला आणि इ. स. १५२७ मध्ये भोजराजाचा मृत्यू ओढवला, यापलीकडे तिच्या चरित्रकारांनाही तिच्या संसाराबद्दल काहीही सांगता येत नाही. कौमार्यावस्थेपासूनच मीरादेवीच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल हा प्रीतीचा मधुरभाव उपजला आणि बळावला असावा, असे मला वाटते.
मीरादेवीच्या वैवाहिक जीवनाचा विचार करताना मला एका चमत्कारिक त्रिकोणाची प्रतीती आली. मीरादेवी - भोजराज - भगवान् श्रीकृष्ण. मीरादेवी ठामपणे गीतातून श्रीकृष्णाचा उल्लेख 'पती आणि प्रियकर' याच शब्दाने करते, म्हणूनच 'त्रिकोण' ही संज्ञा वापरावी लागते. श्रीकृष्णाला ती केवळ 'पती वा प्रियकर' असे संबोधून थांबत नाही तर कल्पनेच्या साक्षात्कारीविश्वात स्वत:पुरती ती त्याला जिवंत करते. प्रणयातले सगळे रागरंग ती तन्मयतेने, धीटपणे भोगते. हे सगळे 'राधा' नावाच्या कल्पित स्त्रीच्या संदर्भात समजता येते. पण इतिहासकालात घडलेली व्यक्ती म्हणून मीरादेवीचा विचार करताना मीरेची श्रीकृष्णप्रीती चमत्कारिक वाटते, विचित्र वाटते. 'भक्ती' हा शब्द सोज्वळ वाटतो. त्यामानाने 'प्रीती.. प्रणय..' हे शब्द उग्र वाटतात. कोणा स्त्रीमुखातून प्रकट होताना भारतीय परंपरेत तरी हे शब्द 'चारित्र्य.. नीती.. शील..' यांसारखी अनेक आव्हाने निर्माण करतात. 'आई, बाप, बहिण, भाऊ, गुरू..' इत्यादी अनेक नात्यांनी देवाशी सख्यत्व जोडणारे साधुसंत आणि संतवृत्तीच्या स्त्रिया भारतीय परंपरेत कशा चपखल बसतात. देवाला 'प्रियकर' मानणारे पुरुषश्रेष्ठही कोठे कोठे भेटतात, तेव्हा ही परंपरा- 'सिद्धांचीसगळीच साधना दुनियावेगळी' एवढाच निष्कर्ष काढून मोकळी होते.
पण श्रीकृष्णाला प्रियकर आणि पती मानणारी, कल्पनेच्या अनुभवविश्वात हे नाते क्षणोक्षणी जगणारी, तसे भीडभाड सोडून उघडपणे प्रकट करणारी स्त्री.. त्यातही विवाहित स्त्री.. एक महाराणी.. अशी एकच. मीरादेवी. देवाशी सख्यत्व जोडणारी इतर सगळी नाती तिने वर्ज्य मानली आहेत. 'प्रीती' ऐवजी 'भक्ती' आणि 'पती' ऐवजी 'पिता' एवढा छोटासा बदल ती या सख्यत्वभावनेत करती तर तिचा कोणताच छळ झाला नसता. तिने तसे केले नाही. विवाहानंतरही गुणवान, रसिक, दिलदार पतीच्या संसारात राहून देखील ती श्रीकृष्णालाच आपला 'प्रियकर आणि पती' मानू लागली. त्यासाठी तळमळू लागली. तेव्हा शिसोदे वंशातल्या राजकुलात एक चमत्कारिक भीषण बाट्य प्रकटले असले पाहिजे. हा एक असा त्रिकोण होता ज्यातली एक बाजू (भगवान् श्रीकृष्ण) अस्तित्वातच नव्हती. पण अस्तित्वात नव्हती म्हणावे तर मीरादेवीच्या हृदयात ती जळजळीत जागती होती. त्या जागतेपणाचा एक दृश्याकार म्हणजे तिचे गाणे-नाचणे. खचितच भोजराजासारख्या रसिक पतीला यापलीकडचे, न बोलता येण्यासारखे काही एक तीव्र अनामिक जगावेगळे दु:ख भोगावे लागले असले पाहिजे.
श्रीकृष्णप्राप्ती होत नाही म्हणून मीरादेवी आणि मीरादेवीची (विवाह होऊनही) प्राप्ती होत नाही म्हणून भोजराज, ही माणसे.. हाडामांसाची माणसे जेव्हा तडफडू लागतात.. त्यांतही परस्परांबद्दल अपार प्रीती बाळगूनही विरहदु:ख भोगीत प्रणयाचे विविध रंगराग व्यक्त करू लागतात तेव्हाच एक वेगळे नाट्य आकार घेऊ लागते. प्रीतीचा शोध जन्माला येतो. प्रस्तुत नाटक म्हणजे असाच एक शोध आहे. श्रीकृष्ण निमित्तमात्र आहे. आहेत ती फक्त हाडामंसाची दोन माणसे. म्हणूनच हा शोध आहे मीरादेवीचा आणि भोजराजाचा. खरे तर त्या दोघांना झपाटणार्या प्रणयभावनेचा.
(संपादित)
वसंत कानेटकर
'मीरा.. मधुरा !' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.