A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आता विसांव्याचे क्षण

आता विसांव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी,
सुखे गोवीत ओवीत त्यांची ओढितों स्मरणी.

काय सांगावें नवल ! दूर रानींचीं पाखरें
ओल्या अंगणी नाचतां होती माझींच नातरें.

कधीं होती डोळे ओले, मन मानसाची तळी,
माझे पैलांतले हंस डोल घेती त्याच्या जळीं.

कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली
आश्वासती, "येत्या जन्मीं होऊं तुमच्याच मुली."

मणी ओढतां ओढतां होती त्याचींच आसवें,
दूर असाल तिथें हो नांदतों मी तुम्हांसवें.
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- २ ऑक्टोबर १९७६.
नातरें - नातवंडें.
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
स्मरणी - जपमाळ.
पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या करतात.

'म्हातारपण' ही मला कायम मनाची अवस्था वाटते. उद्याकडे आनंदाने बघणं, उत्सुकतेने बघणं म्हणजे 'तारुण्य' आणि उद्याचा दिवस उजाडला नाही तरी चालेल असं वाटणं म्हणजे 'म्हातारपण' इतकी सोपी व्याख्या होऊ शकेल का? विशीतली-तिशीतली कितीतरी मंडळी इतकी कंटाळलेली दिसतात. चेहर्‍यावर संपूर्णपणे 'कंटाळा' आणि कश्याविषयीच उत्सुकता नाही, कसलाही शोध घेण्याची वृत्ती नाही. मग ह्याला कशाला 'जिवंत' आणि 'तरुण' म्हणायचं? ह्याउलट सत्तरीतले कितीतरी आज्जी-आजोबा रोज ज्या उत्साहाने नवीन नवीन गोष्टी अंगीकारतात. मुलांकडून, नातवंडांकडून नवीन तंत्रज्ञान समजावून घेतात, त्यांना 'म्हातारं' कसं म्हणणार? ही मंडळी फक्त 'ज्येष्ठ' होत जातात, म्हातारे कधीच होणार नाहीत. आमच्या शांताबाई शेळके त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तरुण होत्या. सुधीर मोघे अगदी शेवटपर्यंत पुढच्या अनेक योजना आखण्यात मग्‍न होते, उद्याकडे हसून पाहत होते. पुलं-सुनीताबाई अगदी अखेरपर्यंत उत्तमोत्तम कलाकृतींना दाद देत होते. ही मंडळी 'ज्येष्ठ' झाली. त्यांच्या आयुष्याची 'उजवण' झाली.

आरती प्रभू एका कवितेत लिहितात, 'तिकडून एक म्हातारा आला, म्हातारा म्हणजे नुसताच म्हातारा... पिकत-बिकत गेलेला नाही.' किती नेमकं लिहिलंय हे !

पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकून घ्यायचंही असतं. ही मंडळी, नातवंडांना गोष्टी सांगतात, त्यांचं अक्षर घडवतात. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून, सून… गुडघे… किंवा इतरांच्या घरातल्या कुटाळक्या करतात.

पिकत गेलेलं एखादं जोडपं जेव्हा संध्याकाळी बागेत बाकावर शांत बसतं, तेव्हा त्यांच्यात शब्दांविना एक संवाद चालू असलेला मला कायम जाणवतो आणि बोरकरांची 'आता विसाव्याचे क्षण' ही कविता आठवते.
आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी
सुखे गोवीत-ओवीत, त्याची ओढीतो स्मरणी'

हे आजी-आजोबा आठवतायत त्यांच्या आयुष्यातले सुंदर क्षण. माळ ओढतायत, पण कोणत्या बाबाची किंवा बुवाची नव्हे तर, सुखाच्या क्षणांची. सुखं गोवताना पुन्हा पुन्हा ते सुंदर क्षण आठवतायत. एकमेकांशी फक्त नजरेने बोलून त्या सुखाच्या क्षणांची उजळणी करतायत. ह्या बोरकरांच्या कवितेचं भाग्य मोठं की ह्या कवितेला संगीतबद्ध केलेल्या माझ्या रचनेला लतादीदींचा स्वर लाभला. त्यांनी 'आता' हा शब्द इतका सुंदर गायला आहे की त्यात आधीची सगळी वर्षं पण दिसतात. मुळात खूप जास्त सांगतो हा 'आता'. सगळं पाहिलं, सुख-दुःख, अडचणी आणि… 'आता' विसाव्याचे क्षण. लतादीदींना मी भूप रागाच्या सुरावटीच्या जवळ केलेली ही रचना आवडली हे माझं भाग्य !

काय सांगावे नवल, दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे
आजोबांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे नातवंडांचा उल्लेख येतोच. त्यांच्यासाठी सगळ्यात हळवा कप्पा म्हणजे त्यांची नातवंडं. पाऊस पडून गेलाय, अंगणांत पाणी प्यायला दुरून पक्षी आले की क्षणभर दोघांनाही वाटतंय की आली पिल्लं… नातवंडं लांब असण्याचा त्रास आहे, पण तक्रार नाहीये ह्या कवितेत.

त्या वयात स्त्री-पुरुष नात्याकडे बघण्याचा एक सुंदर दृष्टिकोन पुढच्या ओळींमध्ये आहे.
कधी पांगल्या प्रेयसी, जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी, होऊ तुमच्याच मुली

आकर्षण, शारीर प्रेमाची ओढ ह्या पलीकडे जाणार्‍या ह्या ओळी आहेत. ह्या जन्मात एकत्र राहता आलं नाही, नव्हता तसा 'योग', पण म्हणून कोणीही तुटलेलं नाही आणि म्हणूनच 'पांगल्या' हा शब्द वापरला आहे. पुढच्या जन्मी तुझ्या मुली होऊन येऊ आणि तुझी आयुष्यभर काळजी घेऊ, असं आश्वासन देणार्‍या प्रेयसी आहेत. नात्याकडे बघायचा किती सुंदर दृष्टिकोन ह्या ओळींमध्ये आहे. ह्या ओळी म्हणताना लतादीदींनीं 'होऊ तुमच्याच मुली' हे शब्द गाताना एक अत्यंत सहज आणि प्रसन्‍न, पण पुसट असं हास्य ठेवत ते गायले आहेत. लतादीदींबरोबर गाणी ध्वनिमुद्रित करणं हा क्षण माझ्या आयुष्यातला एक सुवर्णयोग होता. ही व्यक्ती सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवते आहे, ह्यामागे त्यांचं गाण्यासाठी असणारं ईमान क्षणोक्षणी जाणवत राहतं.

मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हांसवें
ह्या गाण्यातलं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा त्या 'पिकत' गेलेल्या आजी-आजोबांचं, मुलं-नातवंडं-पतवंडं हे सगळे हळूहळू दूर जातात, पण त्या प्रत्येकामध्ये 'हे' आजीआजोबा नांदत असतात, शेवटी ह्यांचेच कण असतात त्या सगळ्या पुढच्या पिढ्यांमध्ये. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे, ह्यांत त्या वयामध्ये आलेला हळवेपणा किती सहज आला आहे. आठवणी काढता काढता सहज भरून येतं असं हे वय.

मुलं आणि नातवंडं ह्यांचं लांब असणं, त्याची खंत वाटणं आणि मग आज-आजोबांनी एकमेकांची समजूत काढणं, हे सगळंच एखाद्या सुंदर कवितेसारखं. मी नुकतीच स्वरबद्ध केलेली बोरकरांचीच अजून एक कविता, ज्यात मला मुलं आणि नातवंडं लांब असल्यामुळे हळहळणारी आज्जी आणि तिला समजावणारे आजोबा असं चित्र दिसलं.

'पिलांस फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे' अशी खंत व्यक्त करणार्‍या आजीला आजोबा समजावतात- 'आता आपुली कांचनसंध्या, मेघडंबरी सोनपुटे'असं काहीसं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं.

कशास नसत्या चिंता खंती, वेचू पळती सौम्य उन्हे
तिमिर दाटता, बनुनी चांदणे तीच उमलतील संथपणे

प्रतिभावंत कवीच्या कवितेतला प्रत्येक शब्द खूप काही सांगणारा असतो, 'वेचू पळती सौम्य उन्हे'मध्ये किती पदर आहेत. उन्हं पळून जाणार आहेत हे नक्की, कारण ही संध्याकाळ आहे, हे मान्य केलं आहे. सौम्य आहेत कारण संध्यकाळचं उन्ह कधीच भाजत नाही. कारण 'सौम्य'पणा मनात आलेलं हे वय आहे. ही उन्हं का वेचून ठेवायची? कारण जेव्हा खूप अंधार होईल, अश्या शेवटच्या क्षणी ह्या सुंदर क्षणांच्या आठवणीच आपल्याला साथ देतील, तेव्हा आत्ता हळहळत क्षण वाया घालवण्यापेक्षा, आपली ही सोन्याची संध्याकाळ, 'कांचनसंध्या' मनापासून साजरी करूया. हे सोन्याचे कण वेचून ठेवूया !!

'कवितेचं गाणं होतांना'चा लेख आणि ह्यातील सार्‍या कविता, गाणी अश्या ज्येष्ठ मंडळींना अर्पण करतो ज्यांनी आम्हाला सगळ्यांना घडवलं आणि आजही घडवत आहेत. ज्यांच्या पिकत जाण्यातून चंदनाचा सुगंध येतो आणि म्हणूनच बोरकर म्हणतात की- अशा लोकांचं आयुष्य संपत नाही, त्यांची 'उजवण' होते.

सले कालची विसरून सगळी भले जमेचे जिवी स्मरू
शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू !!
(संपादित)

सलील कुलकर्णी
सदर- संवाद
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (१० डिसेंबर २०१७)
(Referenced page was accessed on 2 October 2019)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.