जी रुसते प्रेमरता । शांतकाल पाहतां । कालगुणें कठिण बने ।
धांवे निजबलें परि हरि भया । निरामया करित ॥
गीत | - | य. ना. टिपणीस |
संगीत | - | वझेबुवा |
स्वराविष्कार | - | ∙ भार्गवराम आचरेकर ∙ अजितकुमार कडकडे ∙ आशा खाडिलकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | शहा-शिवाजी |
चाल | - | देव तेथे विलसे |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टिपणीस या आडनांवावरून हें घराणें मराठेशाहीच्या ऐन अमदानीत पराक्रम केलेलें असलें पाहिजे हें न सांगतांहि कळण्यासारखें आहे. टिपणीस हे महाडशेजारीं असलेल्या गोंडाळें गांवचे खोत. चरित्रनायकाचे वडील हे मोठे रसिक व तबलावादनांत प्रवीण म्हणून त्या काळीं प्रसिद्ध होते. त्यांचे वडील चिरंजीव चांगले मूर्तिकार होते. नंबर दोनचे चिरंजीव चांगले कवि होते, तिसरा अनुक्रम आपल्या चरित्र नायकाचा, चवथे नट आहेत व पांचवे मात्र 'शेतकरी' आहेत.
अप्पांचा जन्म ता. ३ डिसेंबर १८७६ साली महाड येथें झाला. त्यांचें प्राथमिक शिक्षण महाड येथें झालें. इंग्रजी शिक्षणाकरितां ते कांहीं वर्षे पुण्यासहि होते. त्यांना नाटकाचा नाद लहानपणापासून होता. नाटकाची विशेष आवड उत्पन्न होण्याचें कारण त्यांचे चुलते कै. प्रो. गोविंद गोपाळ टिपणीस यांच्या प्रोत्साहनामुळे प्रत्यक्ष 'महाराष्ट्र नाटक मंडळी' काढण्यापूर्वी गांवांतच वारंवार नाट्य-प्रयोग आसपासचे मंडळीसह बसविले जात व त्यांत अप्पा प्रामुख्याने भाग घेत असत. यांतील कांहीं प्रयोगांतून प्रथम त्यांनीं नायिकेच्याहि भूमिका केल्या. मॅट्रिकचे वर्गीत असतां प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे शिक्षण सोडून त्यांना महाड येथें जावें लागलें. तेथें त्यांनीं कांहीं दिवस शेती केली व उरलेल्या वेळीं ते शिवणकाम उत्तम प्रकारें करीत असत. पण जातिवंत कलावंताच्या जीवाला तशा गांवांत व तशा व्यवसायांत चैन पडणें शक्य नव्हतें. त्यांच्या हातून नाट्यकलेची वाढ व्हावयाची होती. त्यांच्या हातून यशस्वी नाटकें लिहिली जावयाची होती. त्यांचे हौशी व प्रेरक चुलते पुण्यास होते. त्यांचीं गांवांतील नाटकें व्यावसायिकांसारखीं उत्कृष्ट होतात असें म्हणणार्या गावांतील प्रेक्षकांच्या चेतावणीनें, त्यांनी नमुनेदार नाटक मंडळी काढावयाची असा मनाशीं संकल्प केला आणि वडील माणसांची संमति मिळवून त्यांनीं पुणें गांठलें.
आपल्या गोंदूकाकाशीं व त्यांच्या इष्टमित्रांशी चर्चा करून त्यांनी 'महाराष्ट्र नाटक मंडळी'ची कांहीं भागीदार घेऊन स्थापना केली. या मंडळीचा पहिला प्रयोग 'कांचनगडची मोहना' ता. ९ सप्टेंबर १९०४ ला पुणें येथें झाला. या मंडळीची वाढ करण्यांत व तिला नाट्यव्यवसायांत मानाचें स्थान मिळवून देण्यास अप्पांनीं आर्थिक, मानसिक, शारिरिक सर्व तर्हेनें झीज सोसली. गडकर्यांसारख्या प्रतिभाशाली नाटककाराला, नाटककार ठरविण्यांत अप्पांचे परिश्रम बरेचसे कारणीभूत झाले आहेत. ऐतिहासिक वेषभूषा व दृष्यें वास्तवतेच्या दृष्टीनें प्रथम अप्पांनीं रंगभूमीवर आणली. त्याचप्रमाणें ग्रीन पेन्टस्सारखे तोंडाला लावावयाचे रंग येथेंच तयार करावयास सुरुवात प्रथम अप्पांनी केली. १९१० पर्यंत अप्पांनीं नाटक मंडळीचा भागीदार, नट, स्टेज मॅनेजर, तालीम मास्तर म्हणून लौकिक मिळविलाच पण यानंतर त्यांनीं नाटककार व्हावयाचे ठरविलें व ते त्या प्रयत्नास लागले. नाटकाचे कथानकाची मांडणी त्यांनीं मेरी कॉरेलीच्या 'थेल्मा' या कादंबरीच्या आधारें करावयाचें ठरविलें. रंगभूमीचा सर्व प्रकारें त्यांना अनुभव होताच, त्या कादंबरीतून सुटसुटीत कथानक नाटकाकरितां तयार करून 'कमला' नांवाचें सामाजिक नाटक त्यांनी लिहिलें व तें 'महाराष्ट्र नाटक मंडळी'चे रंगभूमीवर १९११ चे फेब्रुवारी महिन्यांत आणले. त्या नाटकानें त्यांना नाटककार म्हणून लौकिक मिळवून दिला. नाटक मंडळीचे मालक, नट व नाटककार होण्याचा मान मिळवणारे अप्पा तिसरे गृहस्थ होत. हा वेळपर्यंत त्यांनीं अव्यभिचारी अशी कलोपासना केली. सांसारिक किंवा इतर गोष्टींत कोठेंहि लक्ष घातलें नाहीं. 'महाराष्ट्र मंडळी'चे हितचिंतकांत समाजसुधारक अशी बरीच मंडळी होती, त्यांचे विचारांचा पगडा अप्पांचे मनावर बसून त्यांनीं विवाह करितांना तो एका बालविधवेशीं सन १९११ त केला. त्यांच्या या विवाहानें त्यांचे समाजांत मोठी खळबळ उडाली. त्याचप्रमाणें त्यांचे कृत्यांचें कौतुक करणारेहि कांहीं होतेच. एकंदरीनें अप्पांचा बोलबाला चांगला झाला.
त्यांच्या लौकिकाचा झालेला परिणाम म्हणून म्हणा अगर इतर अंतर्गत भानगडीमुळें म्हणा त्यांचें आणि भागीदारांचे पटेनासे झाले. 'महाराष्ट्र नाटक मंडळी'सारख्या एका पुढारलेल्या नाटयसंस्थेत फाटाफूट होऊं नये म्हणून पुष्कळ मोठमोठ्या माणसांनीं मध्यस्थी केली पण त्याचा कांहीही परिणाम न होतां १९१२ च्या जूनमध्यें त्यांनीं ती कंपनी सोडली व स्वतःचे मालकीच्या 'भारत नाटक मंडळी' या संस्थेची स्थापना केली. अप्पांचे सरळ व सुस्वभावी वागणुकीमुळें अप्पांचे करितां 'महाराष्ट्र नाटक मंडळी'तील नामवंत नट त्र्यंबकराव प्रधान, वामनराव पोतनीस व दुय्यम दर्जाचीं कामें करणार्या सात आठ नटांनींहि त्या मंडळीला रामराम ठोकून ते अप्पांचे मंडळींत येऊन दाखल झाले. आपले मंडळीकारतां 'मत्स्यगंधा' नांवाचें नवीन नाटक लिहिलें व त्याचा प्रथम प्रयोग ८ सप्टेंबर १९१२ रोजीं पुणें मुक्कामीं झाला. या नाटकाची साजसजावट व दृश्यें अगदी नवीन प्रकारची केलीं होती. हें नाटक अतिशय लोकप्रिय झालें. त्यांनी आपल्या या नवीन नाटक मंडळीकरितां सा. स. तात्यासाहेब केळकर यांचें 'तोतयाचें बंड', विनोद पंडित कै. तात्यासाहेब कोल्हटकर यांचें 'वधु-परीक्षा', कै. अच्युतराव कोल्हटकर यांचें 'विवेकानंद' इत्यादि नाटकें लिहवून घेऊन तीं चांगल्या साजसजावटीत रंगभूमीवर आणली. 'चंद्रग्रहणा'सारखीं अत्यंत लोकप्रिय नाटकेंहि त्यांनीं आपल्या कंपनीकरितां लिहिलीं. त्यांच्या अत्यंत सरळ आणि भोळ्या स्वभावामुळे ६-७ वर्षांपेक्षां अधिक दिवस त्यांना नाट्यसंस्था चालवितां आली नाहीं. पण यानंतर एक स्वतंत्र नाटककार म्हणून त्यांनी चांगलीच कीर्ति मिळविली. गंधर्व, ललितकला, किर्लोस्कर इत्यादि त्या काळीं प्रमुख समजल्या जाणार्या नाट्यसंस्थांनीं त्यांचेकडून नाटकें लिहवून घेऊन ती रंगभूमीवर आणली. १९२१ साली त्यांना नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदाचा मान मिळाला. त्याचप्रमाणें १९३४ च्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाटयशाखेच्या अध्यक्षपदावर त्यांची निवड करण्यांत आली. त्यांची सोळा नाटकें रंगभूमीवर आली. अप्रकाशित व कांहीं अपुरीं अशीं चार राहिलेलीं आहेत. ऐतिहासिक व पौराणिक नाटकांकडे त्यांचा विशेष ओढा. एक दोन नाटकें तर गुजराथी नाटक मंडळ्यांनीं लिहवून घेऊन ती रंगभूमीवर आणलीं.
हें भाग्य हातावर मोजण्या इतक्याच महाराष्ट्रीय नाटककारांना लाभलें आहे. परप्रांतीय नाट्यव्यवसायिकांना, ज्यांचीं नाटकें भाषांतरित करून आपल्या रंगभूमीवर आणावी असा विलोभनीय मोह वाटला, त्यांपैकी अप्पा हे एक आहेत. त्यांच्या नाटकांनी गुजराथी रंगभूमी तर पाहिलीच परंतु कानडी, तेलगु, तामीळ इत्यादि दूरच्या परप्रांतीयांनीहि त्यांची नाटके मोठ्या हौसेने आपल्या रंगभूमीवर आणली. महाराष्ट्रीय नाटककारांच्या उज्ज्वल परंपरेंत अप्पांनी फार मोठी भर घातली आहे. अप्पांनी हीं नाटके लिहून जवळजवळ दोन तपांचा काळ उलटून गेला आहे तरी प्रेक्षकांवर व हौशी नाट्यव्यवसायिकांवर त्यांच्या नाटकांची एवढी पकड आहे की अजूनहि दरवर्षी त्यांच्या नाटकांपैकी ७-८ नाटकांचे नाट्यप्रयोग गांवोगांवी मिळून ५०-६० तरी होत असतात.
त्यांचीं दोन-तीन कथानकें मूकपट व बोलपट संस्थांनीहि चित्रित केली आहेत व ती यशस्वी झालीं आहेत.
अप्पा प्रथमपासूनच राष्ट्रीय वृत्तीचे. गांधीयुग सुरू झाल्यानंतर त्यांत भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा असूनहि त्यांना शारिरिक दुर्बलतेमुळे तसें करतां आलें नाहीं. पण या त्यांच्या इच्छेला अनुसरून त्यांच्या पत्नीनें व कन्येनें त्या चळवळीत भाग घेतला, तुरुंगवासहि पत्करला. अप्पा शेवटपर्यंत खादी वापरीत असत. अप्पा वृत्तीनें सात्विक, त्यांची राहणी अत्यंत साधी.
योजक आणि कल्पक कलावंतांचे दारिद्य हें भूषण असतें. अप्पांचे आयुष्यांतील कांहीं वर्षे सोडली तर या भूषणाचे लेणें त्यांनीं कैक वर्षे मोठ्या अभिमानानें अंगावर मिरविलें. रसिकश्रेष्ठ इंदूर नरेश श्री. तुकोजीराव महाराज होळकर यांच्या कलाप्रियतेचा व अप्पांचे कल्पनाचातुर्याचा संयोग होण्याचा योग एक वेळ जमून आला असतांहि दात्यांची आणि अप्पांची गांठ पडतां नये, असा नियम असल्यामुळें तो उधळला गेला. दुर्दैव महाराष्ट्र रंगभूमीचें; कारण महाराजांच्या कलेच्या हौसेपायीं जो पैसा खर्च व्हावयाचा तो झालाच पण तो कल्पक कलावंतांचे हातीं न पडल्यामुळे महाराजांच्या हौसेचे चीज झालें नाहीं. अप्पांना आपलें कल्पनाचातुर्य दाखवितां आलें नाहीं.
याप्रमाणें चाळीस वर्षे महाराष्ट्र रंगभूमीची बौद्धिक, शारिरिक, मानसिक, आर्थिक अशी सर्व प्रकारें सेवा करणारा एक नट, दिग्दर्शक, कल्पक नाटककार २५ मार्च १९४३ रोजीं आम्हांला सोडून अर्धनारी नटेश्वराच्या रंगभूमीचा महोत्सव साजरा करण्यासाठी कैलासीं निघून गेला.
(संपादित)
शहा-शिवाजी या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे पुराणिक आणि मण्डळी, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.