A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हें कोण बोललें बोला

हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला !'

दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होई -
हें कुणी कुणां सांगावें !
आईच्या हृदया ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें -
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला !'

या अर्ध्या उघड्या नयनीं । बाळ काय पाहत नाहीं?
या अर्ध्या मिटल्या तोंडी । बाळ काय बोलत नाहीं?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हसें मुखावर नाचे !
जणुं बोल दुग्धपानाचे !
कीं मुक्या समाधानाचे !
इतुकेंहि कळे न कुणाला । 'राजहंस माझा निजला !'
गीत - गोविंदाग्रज
संगीत -
स्वर- बापू पेंढारकर
राग - पिलू
गीत प्रकार - भावगीत
मराठी भावगीतांचा कालखंड साधारणपणे १९२५-१९७० हा आहे. त्यामध्ये १९४०-६० हा सुवर्णकाळ मानला जातो. याकाळात जी गीते ध्वनिमुद्रित झाली त्यातली फारच थोडी आजही ऐकायला मिळतात. त्यांची गोडी अवीटच आहे.
एका अंदाजाप्रमाणे सुमारे २००० भावगीते तरी लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.

पहिले भावगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्याच्या आवाजात मुद्रित झाले. गायक होते श्री. व्यंकटेश बळवंत पेंढारकर तथा बापूराव पेंढारकर (१८९२ - १९३७) व गीतकार होते 'गोविंदाग्रज' म्हणजेच सुप्रसिद्ध नाटककार श्री. राम गणेश गडकरी (१८८५ - १९१९). गीताचे बोल होते - 'हें कोण बोललें बोला, राजहंस माझा निजला'. त्यांच्या 'वाग्वैजयंती' ह्या काव्यसंग्रहात ही अठरा कडव्यांची कविता आहे व जुलै १९१२ मध्ये लिहिली आहे. बापूराव पेंढारकर हे 'ललित कलादर्श कंपनी' चे चालक, मालक, गायक, अभिनेते ! गडकरींचे 'पुण्यप्रभाव' हे एकच नाटक त्यांनी केले, पण त्यांच्या सहित्याचे ते चाहते होते. नाटकातल्या पदांमुळे ते ग्रामोफोन कंपनीचे अतियश लोकप्रिय कलाकार होते. १९२२ ते १९३६ पर्यंत त्यांनी सुमारे १४० गाणी (म्हणजे ७० ध्वनिमुद्रिका) गायली. ध्वनिमुद्रिका खूप खपल्या.

गडकरी ह्यांच्या १९२६ सालच्या पुण्यतिथीला (२३ जानेवारीला), बापूराव मुंबईच्या फोर्टात ग्रामोफोन कंपनीचे स्टुडियोत गेले व ही कविता ध्वनिमुद्रित करुन आले, अशी आठवण त्यांचे सुपुत्र विख्यात गायक/अभिनेते श्री. भालचंद्र पेंढारकर यांनी सांगितली. ते नाटकातले पद नसल्याने गीत म्हणूनच मुद्रित झाले. गीताला इंग्रजीत 'Lyric' असे म्हणतात. पिलु रागातले हे गीत एप्रिल १९२६ मध्ये वितरित झाले व त्याच्या खपामुळे १९३१ मध्ये पुन्हा ध्वनिमुद्रिका बनविण्यात आल्या. ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर पिलु (Lyric) असे छापलेले आहे. एकुण १८ पैकी चारच कडवी तीन मिनिटांत बापूराव गाऊ शकले. काहीश्या जलद गतीने गायिलेल्या गीताचा भाव व आशय मात्र नेमकेपणाने मांडलेला आहे. खाजगीत, रंगभूमीवर किंवा संगीत कार्यक्रमांत बापूराव हे पद कधीही म्हणत नसत असे श्री. भालचंद्र पेंढारकर म्हणाले. आज मराठीतलं हे पहिलं मुद्रित भावगीत ऐकायला मिळत नाही.

('राजहंस माझा निजला' हे पहिलं भावगीत आज फारसं कुणाला ठाऊक नसलं तरी त्याकाळी इतकं लोकप्रिय होतं की आचार्य अत्रे ह्यांच्या 'साष्टांग नमस्कार' नाटकात विडंबन गीत म्हणून आलं, ते असं - " हे कोण बोलले बोला, चिंचेवर चंदू चढला ".)

ह्या कवितेचा परिचय करुन देताना गडकरी लिहितात -
"पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही का?"

(चाल - उध्दवा शांतवन कर जा..)
हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला

(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.