दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होई -
हें कुणी कुणां सांगावें !
आईच्या हृदया ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें -
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला !'
या अर्ध्या उघड्या नयनीं । बाळ काय पाहत नाहीं?
या अर्ध्या मिटल्या तोंडी । बाळ काय बोलत नाहीं?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हसें मुखावर नाचे !
जणुं बोल दुग्धपानाचे !
कीं मुक्या समाधानाचे !
इतुकेंहि कळे न कुणाला । 'राजहंस माझा निजला !'
गीत | - | गोविंदाग्रज |
संगीत | - | |
स्वर | - | बापू पेंढारकर |
राग | - | पिलू |
गीत प्रकार | - | भावगीत |
[पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही?]
[चाल : उद्धवा शांतवन..]
हें कोण बोललें बोला ? 'राजहंस माझा निजला !'
दुर्दैवनगाच्या शिखरीं । नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं !
जें आनंदेंही रडतें । दुःखांत कसें तें होई-
हें कुणीं कुणा सांगावें !
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें-
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला !'
मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झालें । अति दुःख थिजवि चित्ताला
तें तिच्या जिवाचें फूल !
मांडीवर होत मलूल !
तरि शोकें पडुनी भूल-
वाटतची होतें तिजला । 'राजहंस माझा निजला !'
जन चार भोंवतीं जमले । मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा । हतभागि मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला । हा दूसरा आतां असला !
तें चित्र दिसे चित्ताला !
हें चित्र दिसे डोळ्यांला !
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुनि वदे ती सकलां । 'राजहंस माझा निजला !'
करु नका गलबला अगदीं । लागली झोप मम बाळा !
आधींच झोंप त्या नाहीं । खेळाचा एकच चाळा !
जागतांच वार्यासरसा । खेळाचा घेइल आळा !
वाजवू नका पाऊल !
लागेल तया चाहूल !
झोंपेचा हलका फूल !
मग झोंपायाचा कुठला ! राजहंस माझा निजला !
हें दूध जरासा प्याला । आतांसा कोठें निजला !
डोळ्याला लागे डोळा । कां तोंच भोंवतीं जमलां?
जा ! नका उठवुं वेल्हाळा । मी ओळखतें हो सकलां !
तो हिराच तेव्हां नेला !
हिरकणीस आतां टपलां !
परि जिवापलिकडे याला-
लपवीन ! एकची मजला ! राजहंस माझा निजला !
कां असलें भलतें सलतें । बोलतां अमंगळ याला?
छबकड्यावरुनि माझ्या या । ओंवाळुनि टाकिन सकलां !
घेतें मी पदराखालीं । पाहूंच नका लडिवाळा !
मी गरीब कितिही असलें
जरि कपाळ माझें फुटलें
बोलणें तरी हें असलें-
खपणार नाहिं हो मजला । राजहंस माझा निजला !
हें असेंच सांगुनि मागें । नेलात जिवाचा राजा
दाविलाहि फिरुनी नाहीं । नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां । राजहंस राजस माझा !
हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्मिंचा दावा?
कां उगिच गळा कापावा-
पाहुनी गरिब कोणाला । राजहंस माझा निजला !
हे काळे कुरळे केश । खेळतात डोक्यावरतीं
ही दृष्टि पहा मम वदनीं । नेहमीं अशी ही असती
हें तेज अशा रत्नांचें । झालें का आहे कमती?
कानांत नाचती डूल,
तोंडावर हंसरें फूल,
जीवाची घालुनि झूल-
मी असाच झांकिन याला । राजहंस माझा निजला !
या अर्ध्या उघड्या नयनीं । बाळ काय पाहत नाहीं?
या अर्ध्या उघड्या तोंडीं । बाळ काय बोलत नाहीं ?
अर्थ या अशा हंसण्याचा । मज माझा कळतो बाई !
हें हंसें मुखावर नाचे !
जणुं बोल दुग्धपानाचे !
कीं मुक्या समाधानाचे !
इतुकेहि कळे न कुणाला- । राजहंस माझा निजला !
या माझ्या मानससरसीं । सारखें प्रेमजल वाही
त्या तरंगलहरींवरतीं । राजहंस पोहत राही
सारखा पोहुनी दमला । मग मला भुकेला बाही !
नयनांच्या शिंपांमधुनी,
अश्रूचे मौक्तिकसुमणी,
मीं दिले तया काढोनी,
मोत्यांचा चारा असला । राजहंस खाउनि निजला ।
ते वैकुंठेश्वर गेले । पदिं त्यांच्या अर्पायाला
ही अखंड या अश्रूंची । वैजयंति मोहनमाळा !
मी करित असें केव्हांची । धरुनियां उराशीं बाळा
कौस्तुभ हा माळेमधला !
हृदयाचें कोंदण याला !
तो चोराया का आलां ?
दैत्याहुनि दैत्यचि झालां ! राजहंस माझा निजला !
हें असें जाहलें म्हणतां । तरि देवचि निजला का हो?
जरि निर्दय होउनि निजला । आळवीन फोडुनि टाहो
कीं असा पोटचा गोळा । पोटांतचि देवा राहो !
ही कुर्हाड आकाशाची,
मजवरतीं पाडायाची,
नाहींच कल्पना त्याची
हा तुमचा कावा सगळा ! राजहंस माझा निजला !
जरि दूत यमाचे आले । लाडक्यास या न्यायाला
ते निष्ठुर असले तरिही । भुलतील पाहुनी याला
हृदयाचें होउनि पाणी । लागतील चुंबायाला
मी मुका असा घेतांना-
हा पहा- पुन्हां हंसला ना?
कां अशा फिरवितां माना?
सुख खुपे काय डोळ्यांला? राजहंस माझा निजला !
हें सर्वस्वाचें फूल । त्या भंवतीं झालां गोळा
मी बघतें- कधिंचा आहे । त्यावरतीं तुमचा डोळा !
एकदां करावा त्याचा वादानें चोळामोळा !
सर्वांच्या मनिंचा लाहो,
हाच ना? स्पष्ट बोला हो,
मी इतकी वेडी का हो-
कीं हेंहि कळेना मजला । राजहंस माझा निजला !
जरि होउं नये तें झालें । तरि सोडणार या नाहीं !
पाळणाहि रुततो ज्याला । प्रेमें जरि निजवी आई !
तो देह खांच दगडांत- छेः । नको नको ग बाई !
हृदयाची खणुनी खांच,
झांकिन मी बाळ असाच,
दुःखांचे फत्तर साच !
जा ! जाउनि सांगा काळा । राजहंस माझा निजला !
जरि काळाचाही काळ । बाळाला न्याया आला !
तरि नाहीं मी द्यायाची । या जीवाच्या जीवाला !
सारखीं गाउनी गाणीं । निजवीन कल्पवर याला !
जा ! करा आपुलें काळें !
माझेही दमले डोळे !
प्राणांचें पसरुनि जाळें-
मी निजतें घेउनि याला ! राजहंस माझा निजला !
सांगुनी असें सकलांशीं । मृत बाळ उराशीं धरुनी
तन्मुखीं स्वमुख ठेवोनी । चुंबिलें एकदां फिरुनी
पाहिलें नीट निरखोनी । झणिं तीही गेली निजुनी !
मग पुन्हां कधीं ती उठली,
जाणीव कुणा ही कुठली?
परि मति या प्रश्नें हटली-
"बोलेल कोण या बोला । राजहंस माझा निजला !"
मग मातापुत्रांवरि त्या । तरु गाळिति कोमल पानें
ढाळिती लता निज सुमनें । पशुपक्षिहि रडती गानें
दशदिशा दगडही कढती । मन दुभंगुनी शोकानें
दुमदुमतें स्थळ तें अजुनी,
त्या एकच करुणागानीं,
जा जाउनि ऐका कानीं !
ऐकाल याच बोलाला । "राजहंस माझा निजला !"
एका अंदाजाप्रमाणे सुमारे २००० भावगीते तरी लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.
पहिले भावगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्याच्या आवाजात मुद्रित झाले. गायक होते श्री. व्यंकटेश बळवंत पेंढारकर तथा बापूराव पेंढारकर (१८९२ - १९३७) व गीतकार होते 'गोविंदाग्रज' म्हणजेच सुप्रसिद्ध नाटककार श्री. राम गणेश गडकरी (१८८५ - १९१९). गीताचे बोल होते - 'हें कोण बोललें बोला, राजहंस माझा निजला'. त्यांच्या 'वाग्वैजयंती' ह्या काव्यसंग्रहात ही अठरा कडव्यांची कविता आहे व जुलै १९१२ मध्ये लिहिली आहे. बापूराव पेंढारकर हे 'ललित कलादर्श कंपनी' चे चालक, मालक, गायक, अभिनेते ! गडकरींचे 'पुण्यप्रभाव' हे एकच नाटक त्यांनी केले, पण त्यांच्या सहित्याचे ते चाहते होते. नाटकातल्या पदांमुळे ते ग्रामोफोन कंपनीचे अतियश लोकप्रिय कलाकार होते. १९२२ ते १९३६ पर्यंत त्यांनी सुमारे १४० गाणी (म्हणजे ७० ध्वनिमुद्रिका) गायली. ध्वनिमुद्रिका खूप खपल्या.
गडकरी ह्यांच्या १९२६ सालच्या पुण्यतिथीला (२३ जानेवारीला), बापूराव मुंबईच्या फोर्टात ग्रामोफोन कंपनीचे स्टुडियोत गेले व ही कविता ध्वनिमुद्रित करुन आले, अशी आठवण त्यांचे सुपुत्र विख्यात गायक/अभिनेते श्री. भालचंद्र पेंढारकर यांनी सांगितली. ते नाटकातले पद नसल्याने गीत म्हणूनच मुद्रित झाले. गीताला इंग्रजीत 'Lyric' असे म्हणतात. पिलु रागातले हे गीत एप्रिल १९२६ मध्ये वितरित झाले व त्याच्या खपामुळे १९३१ मध्ये पुन्हा ध्वनिमुद्रिका बनविण्यात आल्या. ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर पिलु (Lyric) असे छापलेले आहे. एकुण १८ पैकी चारच कडवी तीन मिनिटांत बापूराव गाऊ शकले. काहीश्या जलद गतीने गायिलेल्या गीताचा भाव व आशय मात्र नेमकेपणाने मांडलेला आहे. खाजगीत, रंगभूमीवर किंवा संगीत कार्यक्रमांत बापूराव हे पद कधीही म्हणत नसत असे श्री. भालचंद्र पेंढारकर म्हणाले. आज मराठीतलं हे पहिलं मुद्रित भावगीत ऐकायला मिळत नाही.
('राजहंस माझा निजला' हे पहिलं भावगीत आज फारसं कुणाला ठाऊक नसलं तरी त्याकाळी इतकं लोकप्रिय होतं की आचार्य अत्रे ह्यांच्या 'साष्टांग नमस्कार' नाटकात विडंबन गीत म्हणून आलं, ते असं - " हे कोण बोलले बोला, चिंचेवर चंदू चढला ".)
ह्या कवितेचा परिचय करुन देताना गडकरी लिहितात -
"पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही का?"
(चाल - उध्दवा शांतवन कर जा..)
हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला
(संपादित)
सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.