मीपण ज्यांचें पक्व फळापरी सहजपणाने गळलें हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचें, गेलें तेथें मिळलें हो
चराचराचें होउनि जीवन स्नेहासम पाजळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्कालीं अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळलें हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रें मोहित होऊन जळलें हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुललें अन् परिमळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरींच ज्यां आढळलें हो
उरींच ज्यां आढळले हो
जीवन त्यांना कळलें हो
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वराविष्कार | - | ∙ रवींद्र साठे, अंजली मराठे, अनुराधा मराठे ∙ श्यामा चित्तार, कैलासनाथ जैस्वाल ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- १७ सप्टेंबर १९४७. • स्वर- रवींद्र साठे, अंजली मराठे, अनुराधा मराठे, संगीत- सलील कुलकर्णी. • स्वर- श्यामा चितार, कैलासनाथ जैस्वाल, संगीत- ???. |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
उजवाड | - | उजेड. |
तुळा(ला) | - | वजन काटा. |
दुरित | - | पाप. |
सनातन | - | शाश्वत, चिरकाल. |
सायास | - | विषेष आयास (कष्ट), श्रम. |
सिंधु | - | समुद्र. |
मुक्ती नको मज तृप्ती नको, मज येथील हर्ष नि शोक हवा
बा. भ. बोरकरांच्या या ओळी एकीकडे.. तर दुसरीकडे-
आम्हा नाही नामरूप, आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा निळा धूप..
नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी..
असंही बोरकरांनीच लिहिलेलं. अभिषेकीबुवांनी ह्या कवितेचं एक अजरामर गाणं केलं. 'कवितेचं गाणं होताना'च्या चित्रिकरणासाठी गोव्यात, बोरी गावामध्ये बाकीबाब ज्या घरात राहात होते तिथे गेलो आणि त्या घराकडे डोळे भरून पाहिलं. खरंतर घरासारखं घर आहे.. जमीन, भिंती आणि छप्पर.. पण वेगळं आहे ते तिथे जाणवणारं 'काहीतरी' जे शब्दांत पकडता येत नाही. त्याच जागेत बसून अभिषेकीबुवांनी बोरकरांना 'नाही पुण्याची मोजणी' ऐकवलं असेल, त्यांच्या गप्पा झाल्या असतील. पु.ल. आणि सुनीताबाई आले असतील इथे, बोरकरांच्या कवितेचे फार मोठे चाहते होते ते दोघंही. सगळ्यांनी मिळून शब्दांचा आनंद लुटत 'गडद निळे, गडद निळे, जलद भरुनी आले' गायलं असेल. कधी मंगेश पाडगांवकर आले असतील.. आणि इथेच बसून एकटे बाकीबाब आयुष्याविषयी चिंतन करत असतील, ज्यातून इतक्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाने परिपूर्ण अशा कविता त्यांना सुचल्या असाव्यात. अशा तीन कविता मला तिथे आठवल्या, ज्या वाचता वाचता मला खूप मोठा विचार मिळाला आणि त्याचं गाणंसुद्धा झालं.
जीवन त्यांना कळले हो
'मी'पण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
अहंकार सहजपणाने गळून जाणं महत्त्वाचं, आणि माणूस पिकल्याशिवाय म्हणजेच परिपक्व झाल्याशिवाय ते होणारही नाही. प्रतिभावंत कवीच्या कवितेतला प्रत्येक शब्द महत्त्वाचा. अहंकार ठेचला जातो आजच्या काळात, पण बोरकर बोलतात ते सहजपणाने अहंकार गळून जाण्याविषयी. ह्याची चाल करताना 'सहजपणा' ह्या शब्दाकडे माझं विशेष लक्षं होतं. 'सहज' हा शब्द गायचा, पण चाल मात्र गुंतागुंतीची.. असं योग्य झालं नसतं. चालही सहज हवी. तसा प्रयत्न केला मी.
या कवितेत बोरकर पुढे म्हणतात-
जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो..
एखादा श्लोक अथवा सुभाषिताइतकी ताकद असलेली ही कविता आहे. शेवटच्या ओळींमधला विचार तर फारच खोल खोल नेणारा.. बोरकर म्हणतात-
दुरित जयांच्या दर्शनमात्रे, मोहित होऊन जळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो..
पुण्यसुद्धा ज्यांच्या व्यक्तित्वामधून परिमळ घेईल अशा ह्या व्यक्ती. पण हे सारं कधी होईल जेव्हा, 'मी'पण गळून जाईल आणि ते सुद्धा सहजपणाने !
इतका खोल विचार खूप सोसल्यानंतरच येतो, म्हणून दुसर्या कवितेत बोरकर लिहितात-
रे अजून थोडे सोस मना..
ही कविता संगीतबद्ध करताना त्यातल्या 'अजून' ह्या शब्दाचा नाद, त्यात असलेला वाट पाहण्याचा दीर्घ काळ आणि त्रास होत असतानाही सोसत राहण्याची तयारी, असं सगळं आणण्याचा प्रयत्न होता. संपूर्ण कविता हाच मुद्दा मांडते की, बघ.. सोसल्याशिवाय कुठलीच खरी गोष्ट मिळत नाही.
जळल्यावाचून नाही ज्योती, कढल्यावाचून नाही मोती
रडल्यावाचून नाही प्रीती, नच घणांवाचूनि देवपणा
रे अजून थोडे सोस मना..
बोरकरांच्या घरात बसून ही गाणी गाताना एक अवर्णनीय आनंद मिळाला, कुठल्याही शब्दात न सांगता येणारा.. आणि खरंतर जेव्हा मी ही तिसरी कविता गायलो तेव्हा गळा दाटून आला..
तू राहा अशीच दूर
मी भरून ऊर एकलाच
आळवीन जो दिलास सूर
आयुष्यात लहानपणी कोणीतरी एक दिशा देणारं वाक्य बोलतं, आपण संकटात असताना कोणी तरी एकदाच पाठीवर हात ठेवून 'लढ' म्हणतं, कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेतल्यासारखं आणि मग आयुष्यभर पुरून उरतो तो एक आशीर्वाद. एकदाच झालेला प्रतिभेचा स्पर्श, एकदाच दिलेला एक मूलभूत विचार आणि तो कायम राहतो आपल्याबरोबर !
मला खूप माणसं आठवतात ह्या ओळी गाताना, पहिल्या वाढदिवसाला मला भेट म्हणून हार्मोनियम देऊन माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी देवाघरी गेलेले माझे 'बाबा' आठवतात. कलाक्षेत्राकडे पाहायची नजर देणारे सुधीर मोघे आठवतात. सहज बोलता बोलता खूप काही सांगून जाणार्या शांताबाई शेळके आणि खूप माणसं.. जे एकदाच इतकं भरभरून देतात की आपल्याला आयुष्यभर ते पुरतं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणूनच बोरकर ह्या कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये लिहितात-
दीस जेधवां पडेल पालथा जसा घडा
पिंपळापलीकडून अन् झडेल चौघडा
जांभळ्या घरावरून कोवळा चढेल धूर
एकलाच आळवीन जो दिलास सूर
तू राहा अशीच दूर
(संपादित)
सलील कुलकर्णी
सदर- कवितेचं गाणं होताना
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (१६ एप्रिल, २०१७)
(Referenced page was accessed on 08 August 2025)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.