A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू

हानी होवो कितीही भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
तसू - दोन बोटांचे माप.
संगर - युद्ध.
१९६२ साली भारत-चीन युद्धाचा वणवा पेटला होता. युद्धात सैनिक प्राणपणाने लढत होतेच. जनतेच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी रेडिअओनेही हातभार लावला होता. रेडिओवर बर्‍याच मोठ्या प्रमाणात समरगीतांचं प्रसारण व्हायचं. ती समरगीतं तयार करण्यासाठी आकाशवाणी निरनिराळ्या संगीत दिग्‍दर्शकांना व गायकांना आमंत्रित करीत असे. त्यावेळचे रेडिओ स्‍टेशनचे प्रोड्युसर समरगीतासाठी माझ्याकडे पण यायचे. यायचे तेही मुठी आवळून. समरगीत गायचं ना, ते जोरातच व्हायला पाहिजे. ते किती जोरात गायचं याला पण मर्यादा आहेतच ना? तरी पण ते म्हणायचे, "जोरात म्हणा."

वसंतराव देसाई यांचं एक खूप प्रसिद्ध झालेलं त्यावेळचं समरगीत म्हणजे,
'माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू'

हे गाणं प्रथम रेडिओसाठी तयार केलं गेलं व मी त्याचा प्रमुख गायक होतो. रेडिओ रेकॉर्डिंगच्या वेळी माझ्याबरोबर इतर बरेच मान्यवर गायक-गायिका कोरस म्हणायला होते. पण नंतर त्याची रेकॉर्ड निघाली ती महेंद्र कपूर यांच्या आवाजात. पण रेकॉर्ड व्हायच्या अगोदर माझ्या अंदाजाप्रमाणे किमान ५०-६० वेळेला तरी मी सार्वजनीक ठिकाणी गायलो होतो. वल्लभभाई स्टेडियमवर पाठीमागे २००० मुलांना घेऊन सोलो गाणारा प्रमुख गायक मीच होतो. वसंतराव देसाई हुशार व कल्पक होते. व्यावसायिक वादक येऊ शकत नव्हते म्हणून पोलीसबँडच्या कलाकरांना घेऊन यायचे. त्यांना तेवढी लाईन वाजवायला लावायचे आणि तेवढ्या मोठ्या मैदानावर गाणं दणकन जोरात होई. वसंतरावांची आणखी कल्पकता म्हणजे शाळेतल्या संगीत शिक्षकांचं ते शिबीर घेत. सर्व शिक्षकांना ते गाणं स्वत: शिकवीत व मग त्यांनी आपापल्या शाळेतील सर्व मुलांना ते गाणं शिकवायचे. असं ते गाणं मुलांच्या कोरस आवाजात व्हायचं. मुलंही मोठ्या प्रेमाने म्हणायची; अगदी शिस्तबद्धतेने ! समरगीतं कशी असावीत व कशी गावीत याचा मला तो वस्तुनिष्ठ पाठ होता.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.