असुनियां पाणी
कोमेजलिं कवळीं पानं
असुनि निगराणी
केळीचे सुकले बाग
अशि कुठें लागली आग
जळति जसे वारे
कुठें तरी पेटला वणवा
भडके बन सारे
केळीचे सुकले बाग
किति दूरचि लागे झळ
आंतल्या जीवा
गाभ्यांतिल जीवन रस
सुकत ओलावा
केळीचे सुकले बाग
किति जरी घातलें पाणी
सावली केली
केळीचे सुकले प्राण
बघुनि भवतालीं
केळीचे सुकले बाग
ऑर्गन, तबला, सारंगी किंवा व्हायोलिन आणि हार्मोनियम अशी वाद्ये साथीला असली म्हणजे गायकाला पुरेसा स्वर-भरणा मिळून तो बैठक जमवतो.
परंतु ज्या वेळी गीताला स्वतंत्रपणेही वाद्यवृंदाची जोड द्यावी, असे रचनाकाराला वाटू लागले त्या वेळी फ्ल्यूट, सतार, पियानो इत्यादी वाद्यांचाही हळूहळू वापर होऊ लागला. प्रत्यक्ष गीताचे शब्द सुरू होण्यापूर्वी एक वातावरण निर्माण करण्यास या वाद्यमेळाचा उपयोग होऊ लागला. गाताना गायकाला मधून मधून विश्रांती मिळावी म्हणून एखाद्या ओळीची पुनरावृत्ती वाद्यमेळावर केली जाऊ लागली. तसेच वाद्यमेळाची मदत विशिष्ट सुरापर्यंत गाणे (शब्दाविना) पोहोचविण्यासाठी घेतली जाऊ लागली.
तरीही १९६० - ६५ पर्यंत वाद्यमेळाचे स्थान तसे गौणच होते. मात्र पुढे पुढे सिनेमातील गाण्यांचे अनुकरण करण्यासाठी म्हणा किंवा वाद्ये अधिक संख्येने वापरण्याची हौस म्हणून म्हणा, वाद्यमेळाचा उपयोग वाजवीपेक्षा जास्त होऊ लागला. हल्ली काही काही ध्वनिमुद्रिकांत हा वाद्यमेळ शब्दांनाही खाऊन टाकतो. गीताचे शब्दप्रधान स्वरूप त्यामुळे बिघडते.
इतकेच काय पण चांगले शब्द नसू देत, आपण वाद्यमेळानेच गीत आकर्षक करून दाखवू अशी ईर्ष्या काही रचनाकारांत निर्माण झालेली आहे. ही प्रथा जर अशीच चालू राहिली तर गीतरचनेला चांगले शब्द शोधण्याची जरुरीच नाहीशी होत जाईल. आणि परिणामी आम्ही आशयघन अशा चांगल्या कवित्वाला पारखे होऊ अशी भीती वाटते. ललित संगीताची ही फार मोठी हानी समजायला हवी.
कवीच्या अंत:करणातील प्रामाणिक भावनेचा आविष्कार योग्य शब्दांअभावी चांगला होणार नाही. त्यामुळे भावगीताची मूळ प्रकृतीच रोगट राहील. चांगल्या गळ्याचे गायक काय किंवा चांगल्या चालीची वैशिष्ट्ये काय, अशा रोगट शब्दरचनेत प्राण भरू शकणार नाहीत.
ज्यांच्या हाती भावगीताचा प्रसार करण्याची साधने आहेत (रेडिओ, ग्रामोफोन कंपनी, टेलिव्हिजन, संगीत सभा) त्यांनी धंदेवाईक दृष्टीबरोबरच कलेतल्या चांगल्या गुणांशीही थोडेसे इमान राखण्याचा प्रयत्न केला तर भावगीत परंपरेला उज्ज्वल भविष्य लाभेल यात शंका नाही.
भावगीतांच्या या अखंड परंपरेत कालानुसार काही बदल अपरिहार्यपणे होईल. तो झालेला बदल कधी टिकेल तर कधी विरेलही. पण काही गोष्टी अशा असतील की ज्यांचे मूल्य चिरंतनच राहणार. त्यांतील एक सर्वसामान्य गोष्ट जरी या क्षेत्रातल्या कलावंतांनी जपली तरी या भावगीत परंपरेचे थोडे तरी ऋण आपण फेडल्यासारखे होईल. ती गोष्ट म्हणजे कवी, संगीत-दिग्दर्शक आणि गायक या तिघांनीही आपापल्या पातळीवर कलेचा प्रामाणिक आविष्कार करावा. त्यामुळे भावगीतांची परंपरा समृद्ध आणि सुदृढ होईल.
(संपादित)
यशवंत देव
शब्दप्रधान गायकी
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.