A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माळ्याच्या मळ्यामधे कोण

माळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी?
राखण करते मी रावजी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !

औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं ग
चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं ग
काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !

नार गोमटी तू देखणी, ठुसका बांधा ठसला मनी
फुलराणी जीव माझा साजणी ग जडला तुझ्यावरी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !

माळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी
वांगी तोडते मी रावजी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !

गोर्‍या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग
अंघोळीला बसले माझं मलाच येई हसू ग
पदर राहिना खांद्यावरी, पिसाट वारं भरलं उरी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !

शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी
मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला खरोखरी

माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
वांगी तोडते मी रावजी
रावजी, हात नका लाऊ जी पाहिल्‌ कुणीतरी !
गोमटा - मनोहर / सुंदर.
काही वर्षापूर्वी कै. मास्तर कृष्णराव 'विठु माझा लेकुरवाळा' या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करीत होते. त्यावेळी जुन्या जमान्यातील एक हार्मोनिअम वादक तथा अभिनेते कै. वसंत एदिक, कै. मास्तर कृष्णरावांचे सहाय्यक म्हणून काम करत हाते. मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत काही अभंगांचे ध्वनीमुद्रण चालले होते. त्या अभंगाच्या साथीला काही टाळ वाजवणार्‍यांच्या ते शोधात होते. काही वर्षापूर्वी माझी त्यांच्याशी सुप्रसिद्ध अभिनेते श्री. शाहू मोडकांकडे भेट झाली होती. मला तबला वादनाचे अंग आहे, याबद्दल त्यांना माहिती होती. तेव्हा टाळ मी वाजवू शकेन, या अंदाजाने ते माझ्या घरी आले. त्यांनी मला "तू टाळ वाजवण्यासाठी ध्वनीमुद्रणाला ये. त्या निमित्ताने तुझी कृष्णरावांशी ओळखही होईल." असे सांगितले व "पुढे तुला ते तबल्याच्या साथीलाही बोलावतील. तेव्हा हे काम तू टाळू नको." असे म्हणाले. मी लगेच तयार झालो व त्यांच्या बरोबर मेहबूब स्टुडिओत गेलो. त्यांनी माझी ओळख कै. कृष्णरावांशी करून दिली. कै. कृष्णरावांनी "ये, बैस बाळ !" असे म्हणत प्रसन्‍न मुद्रेने माझे स्वागत केले. त्यांच्या कपाळावरील केशरी गंध, मुखावरील मांगल्य माझ्या अजून स्मरणात आहे. अभंगाच्या ध्वनीमुद्रणात इतर काही टाळवाजवणार्‍या मंडळीत बसून मीही त्यांच्या सहाय्याने सुत्रबद्ध वारकरी पध्दतीचे टाळवादन व अस्ताई नंतरची तोड अचूक वाजविली.

त्या दिवशी त्यांना अनेक अभंगाचे ध्वनीमुद्रण करायचे होते. तेव्हा काही अभंगांच्या ध्वनीमुद्रणानंतर जेवणाकरिता एक तास सर्व वादकांना विश्रांती दिली. मी बाजूच्या कॅन्टीनमध्ये जाऊन स्टुडिओत परतलो त्यावेळी त्या ठिकाणी कुणीच नव्हते. टेबलावर हार्मोनिअम होती. मी सहज हार्मोनिअमवर एक हिंदी गजल गुणगुणत होतो, 'मुझको नही सुनाओ दुखदर्द की कहानी, कही याद आ न जाए कोई दास्ता पुरानी' तेवढ्यात "वा वा क्या बात है !" अशी दाद देत एक व्यक्ती माझ्याजवळ आली. "काय रे तुझं नाव?" मी त्यांना माझे नाव सांगितले. ती व्यक्ती म्हणजे पुण्याचे बासरी वादक श्री. मधु गाडगीळ आणि संगीत दिग्दर्शक श्री. राम कदम यांचे बंधुतुल्य मित्र होते, हे मला समजले. ते म्हणाले, "मला तुझे नाव व पत्ता दे. मी रामला (कदम) तुझ्या बद्दल सांगेन. ते तुला चित्रपटात गाण्याची संधी नक्की देतील. सायंकाळी ध्वनीमुद्रण पूर्ण झाले व ते पुण्याला गेले. एक आठवड्याने मला श्री. राम कदम यांचे पत्र आले गोरेगाव येथे रहाणारे चित्रपट निर्माते श्री. दत्ताराम गायकवाड हे 'वैभव' नावाचा चित्रपट तयार करण्याच्या योजनेत होते. गाण्याच्या ध्वनीमुद्रणानेच चित्रपटाचा प्रारंभ करणार होते. ते गीत श्रीमती उषा मंगेशकरांबरोबर गावयाचे होते. 'दत्तत्रय लॉज' मधील एक मोठी रूम गाण्याच्या तालमीकरिता निर्माते गायकवाड यांनी राखून ठेवली होती. श्री. राम कदम यांनी मला पत्रातून कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी यायचे त्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे मी जरा संकोचानेच त्या लॉजमध्ये प्रेवश केला. श्री. राम कदम यांच्याशी परिचय झाला. ते निर्माते गायकवाडांना म्हणाले, "मी ह्या मुलाला उषाताईंबरोबर गायला बोलावले आहे." तेव्हा गायकवाड म्हणाले, "बर मग ह्याची, ट्रायल घ्या." असे म्हणताच राम कदम म्हणाले, 'मी ह्याला ट्रायलकरिता बोलावलेले नाही, ह्याला रेकॉडींगसाठी बोलावले आहे'. माझा जिवलग मित्र ज्या वादकाचं किंवा गायकाचे नाव सांगतो, तेव्हा तो नक्कीच चांगला कलाकार असतो, याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्या मित्रावर केवढा हा विश्वास !

श्री. रामभाऊंनी मोठ्या प्रेमाने मला जवळ बोलावले आणि पेटीवर एक ओळ गाऊन दाखवली व मला गाण्यास सांगितली. मी ती गाऊन दाखवली रामभाऊ मोठ्याने म्हणाले, "शाब्बास, मला खात्री आहे तू १००% चांगला गाशील." या त्यांच्या उद्गाराने मला अत्यानंद झाला, एक वेगळाच उत्साह आला. पहिल्याच भेटीत त्यांनी माझी उमेद वाढवली. मुंबईत तालीम करून त्यांनी माझी पुण्याला त्यांच्या वादकवृंदातही तालीम करून घेतली. कलावंताशीही परिचय करून दिला. याचे कारण मला जेव्हा कळले तेव्हा त्यांच्या मोठेपणा बद्दल मी भारावून गेलो ते म्हणाले, "आता रेकॉर्डिगच्या दिवशी कोणताही नवखेपणाचा संकोच तुझ्यात रहाणार नाही. तू आता मोकळेपणाने गाऊ शकशील. तेवढ्याच करिता तुला पुण्याला नेले आणि वादकांचा परिचय करून दिला." तेव्हा मला हे कळले की, नुसता कलावंत गात नसतो तर संगीत दिग्दर्शक त्याची कला अधिक खुलवून त्याच्याकडून गावून घेतात. तेथे श्री. मधु गाडगीळही होते. ते म्हणाले, "बघ, तुला सांगितल्याप्रमाणे रामने तुला बोलावले की नाही? आता ते तुला नेहमी बोलावतील." आणि तसेच झाले. श्री. राम कदम यांनी प्रत्येक चित्रपटात मला गायची संधी देऊन माझा आत्मविश्वास वाढविला. त्यांचे हे उपकार मला कधीही विसरता येणार नाही.

त्यानंतर श्री. दादा कोंडके यांचा सोंगाड्या चित्रपट रामभाऊंकडे त्यांनी सोपवला. तेव्हा रामभाऊंनी 'माळ्याच्या माळ्यामधी कोण गं उबी' आणि 'काय ग सखु' ही दोन द्वंद्वगीतं श्रीमती उषा मंगेशकरांबरोबर माझ्याकडून गाऊन घेतली. शहारापासून खेड्यातील घराघरापर्यंत ही गीतं गेली आणि मी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलो.
(संपादित)

जयवंत कुलकर्णी
’स्वरांच्या मळ्यात’ या जयवंत कुलकर्णी यांच्या गीतसंग्रहातून.
सौजन्य- स्वर आर्टस्‌, मुंबई.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी