शकुन गे, माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जिवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | बैरागी भैरव |
गीत प्रकार | - | संतवाणी |
उंडी | - | नैवेद्य. |
कै | - | केव्हा. |
गोठी | - | गोष्ट. |
पढिये | - | आवडते. |
प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या स्त्रीरूपातून परमेश्वरभेटीसाठी वाट पाहणार्या भक्ताचा प्रत्यय येथे ज्ञानेश्वर देत आहेत. या अभंगाचा विशेष असा की, लोकमानसात रुजलेल्या लोकसंकेताचा ते वापर करून घेतात. स्त्रीचे अनुभवविश्वही ते नेमकेपणाने प्रकट करतात. घास भरवण्याला स्त्रीच्या विश्वात अतिशय महत्त्वाचे स्थान असते. येथे कावळा ओरडतो आहे म्हणजे पाहुणा येण्याचा शुभशकूनच ज्ञानेश्वर सांगतात. आता हा पाहुणा म्हणजे जिवाचा जिवलग, प्रियकर श्रीविठ्ठलच. त्याच्या येण्याची सूचना देणार्या कावळ्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे तिला झाले आहे. तो उडून चालला की तिची अधीरता अधिकच वाढते. ती त्याच्या पायाला सोन्याचे वाळे घालण्याचे, दहिभाताचा गोळा त्याला देण्याचे, वाटीभरून दूध देण्याचे कबूल करते. या सगळ्यातून तिला जाणून घ्यायचे आहे की, विठ्ठलाचे आगमन नक्की होणार ना? आणि कधी होणार? एवढेच नाही तर तिचे अधीर मन त्याला आंब्याच्या डहाळीवरच्या आम्रफळांचाही मोह घालते आहे. म्हणजे तुला हवं ते, आवडेल ते सारं सारं मी देत्ये पण मला सांग की विठ्ठल येणार ना नक्की?
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले
'ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग' या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि डॉ. द. ता. भोसले लिखित पुस्तकातून.
सौजन्य- प्रतिमा प्रकाशन, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
ईश्वराच्या भेटीच्या उत्कंठेने मी कधी तर माणसांतून उठतो आणि पांखरांत जाऊन बसतो. मी त्यांना म्हणतो, "तुम्ही पृथ्वी सोडून आकाशात उडणारे आहात, तुम्हाला ईश्वराचे दर्शन असले पाहिजे. माझ्या घरीं पंढरीचे पाहुणे केव्हा येतील, मला सांगा. तुम्हाला काय हवे ते मी देईन." ते म्हणतात, "तुझे काही आम्हाला नको, पंढरीचे राणे तुला अवश्य भेटतील. केव्हा भेटतील, तुझ्या हृदयातच कळेल मग."
आचार्य विनोबा भावे
'ज्ञानेश्वरांची भजनें' या आचार्य विनोबा भावे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.