A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा

जय महाराष्ट्र ॥

हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी ।
ते सर्व मराठे आम्ही साडेपाच कोटी ।
ऐक्याची शपथ घेऊया काय मग खोटी ।
दावून कधी काळींचे । दैन्य भाळींचे । दिस सोन्याचे । भविष्यापोटी ॥

राज्य मराठी नागपूराहून गोव्यापर्यंत ।
पैठण इकडे पसरे तिकडे दर्या अपरांत ।
तापी वरदा वाहती झुळझुळ तशी वैनगंगा ।
गोदा भीमा कृष्णा आणिती जीवन रसरंगा ॥

हा दगड फुलांचा मर्द मराठी देश
कणीकोंडा खाया, अंगी फाटका वेष
परि नसानसांतून संचरतो आवेश
स्वातंत्र्यदेवीचे भक्त । उसळते रक्त । इमानी सक्त । साक्ष परमेश ॥

परिमळामाजि कस्तुरी । फुलांत फूल मोगरी ।
ये मराठीचिये घरी । विद्येचा सुकाळू करी । ती अद्भुत ज्ञानेश्वरी
तुकोबाची भावपंढरी । इथे कडेकपारीमधुन घुमली शाहिरी ॥

भाषा जहाल चिपळुणकरी । केशवसुत देति ललकारी । गर्जती टिळक केसरी । हरिभाऊंची कादंबरी । जोतिबा जळती अंतरी । अण्णांची नाट्यचातुरी । देवलांची कोणाला सरी । पुढे कोल्हटकर गडकरी । पठ्ठे बापुराव फडकरी । शाहीर हैदर लहरी । बालकवी निर्झरापरी । केळकरी नर्मचातुरी । सानेगुरुजी भावनिर्झरी । तांब्यांची गोड ललकारी ॥

या मराठीच्या मंदिरी । आसनावरी । थोर कितीतरी । शारदापुत्र कीर्तीवंत ।
कवी कथाकार कलावंत । किती शाहीर किती संत ॥

अजिंठ्याची कला काय खुले । नागपूरात वैभव झुले ।
कोरड्यात कपासी उले । कृष्णाकिनारी शाळू डुले ।
कोकणची फळे अन्‌ फुले । मुंबईला बघुन मन भुले ।
'जय महाराष्ट्र' गर्जती धरतीची मुले ॥

मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा । जरा मनात आणा । त्यांचा त्यागाचा बाणा । नाही भ्याले मरणा ।
शिवराय बाजी तानाजी । ते धनाजी नि संताजी । पेशवाई पहिला बाजी । अभिमन्यूपरी जनकोजी । राघो भरारी नि महादजी । महादजी हो गोखला बापू रणगाजी ॥

सत्तावन सालचे बंड । पेटले चंड । राहू काय थंड । ठोकुनी दंड ।
मराठे प्राण देती समरात । मर्दानी झाशीवाली हो त्यात । सायबानं हाय खाल्ली चित्तात ॥

आम्ही नेक मराठे हिंदभूमीचे पुत्र । आम्ही पूज्य मानतो एकच हिंदी छत्र । आमुचे आम्हाला घर राहू दे मात्र ।
ही एक आमुची आस । एक हा ध्यास । याच घोषास । करू सर्वत्र ॥

सह्याद्रीचे पिउनी वारे कृष्णेचे पाणी । वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जयगाणी ॥

तो प्राण पाखडी वासुदेव बळवंत ।
चाफेकर फासावर गेले झाले यशवंत ।
सावरकर जन्मठेपेत अंदमानात ।
सात वर्षं सजा टिळकांना ब्रह्मदेशात ।
राजगुरू भगतसिंगाचा छावा स्वर्गात ।
शिरोड्याला रंगले मीठ मर्द रक्तात ।
बाबू गेनू शूर वीरांची मरणावर मात ।
क्रांतीवीर कर्मवीरांचा आमुचा प्रांत ।
परमवीर चक्र राण्यांना पहिले देशात ।
तो मराठभूचा पुत्र विनोबा संत ॥

या हो सान थोर कुलवंत । कवी कलावंत । संसारी वा संत ।
जय जय महाराष्ट्र बोला । बोला एकस्वरीं बोला ।
घोष तो भिडवू गगनाला ॥