A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शांत सागरीं कशास

शांत सागरीं कशास उठविलींस वादळें?
गायिलें तुवा कशास गीत मन्मनांतलें?

काय हें तुझ्यामुळें
देहभान हरपलें
युगसमान भासतात आज नाचरीं पळें !

अमृतमधुर बोल एक
श्रवणिं जों न पाडिलास
अधिरता भरे जिवांत केवढी तयामुळें !

स्वर्ग कल्पनेंतला
येइल कधिं भूतला
दिवसरात्र अंतरांत आस ही उचंबळे !
आसवणे - आतुर, उत्सुक, आशायुक्त.
सौ. संजीवनी यांनी आपल्या 'शांत सागरीं कशास उठविलींस वादळें?' या करुणरम्य भावगीतानें व त्यांच्या आर्तकोमल स्वरानें सबंध महाराष्ट्राचें लक्ष आपल्याकडे वेधलें आहे. त्यांचें हें गीत ऐकतांना मन पर्युत्सुक होतें व जन्मांतरांच्या कसल्यातरी अबोध सौहृदावर मन तरंगूं लागतें. त्यांतील शब्द शब्द व स्वर स्वर आपल्याला झपाटतो. याला ज्याप्रमाणे भावगीताचे भाव व स्वर कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे सौ. संजीवनीचें व्यक्तिमत्वहि आहे. सौ. संजीवनीची भावशील वृत्ति, त्यांचें मोकळे बोलणे, त्याचा निर्मळ खेळकरपणा किंवा त्यांचें हसरें चापल्य या सर्वांचें प्रतिबिब त्यांच्या कवितेंत पडलें आहे.
(संपादित)

कवी गिरीश
'भावपुष्प' या संजीवनी मराठे यांचया गीतसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.