A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्दशस्त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्व पट ब्रह्म दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
ताटी - कुंपण, बांध.
वन्ही - अग्‍नी.
इवलीशी मुक्ता. झोपेतून उठलेली अन् आईबाबांना नजरेने शोधणारी. मला उचलून घ्यायला कोणीच कसे येत नाही म्हणून बावरलेली. धावतच ज्ञानदादापाशी गेली अन् विचारू लागली, "दादा, आई कुठेय?" ज्ञानदादाच तो ! त्याला बरोबर कळले काय सांगावे या चिमुकल्या मुक्ताला. अगदी हळुवारपणे म्हणाला, "आई ना, सांगून गेलीय की रडायचे नाही!" एवढेच वाक्य पुरेसे झाले. मुक्ताच्या मनात दाटून आलेले कढ, डोळ्यांत उतरून आलेले अश्रू सारे जागच्या जागी जिरले. तिचे बालपण, तिचे अवखळपण माहिती नाही कुठे गेले; पण क्षणात समंजस झाली मुक्ता.

काहीच न कळण्याचे वय अशी अजाण मुक्ता. तिला कसे कळणार आई-बाबांनी या उघड्या आकाशाखाली आपल्याला सोडून देहान्त प्रायश्चित्त घेतले. धर्ममार्तंडांचा दांभिक निर्णय तिला कसा उमजणार? आई-बाबांच्या लग्‍नानंतर काही वर्षांत बाबांनी संन्यास घेतला होता; पण गुरूंच्या आज्ञेने ते पुन्हा संसारात आले होते. हा समाजाच्या दृष्टीने गुन्हा होता. या कशाचीही जाण असण्याचे वय नव्हते तिचे. ही शिक्षा तरी त्या अजाण बालिकेला कशी कळणार? ज्ञानदादाच्या वाक्याने तिला एकच कळले, की आता कडेवर उचलून घेऊन लाड करायला बाबा येणार नाहीत, की कुशीत घ्यायला आईदेखील येणार नाही. ज्ञानदादाने सांगितलेला आईचा निरोप आता तिच्या कानातून मनात भरला. ती नि:शब्द होऊन बघत राहिली. बाबांची कामे निवृत्तीदादा करू लागलाय अन् ज्ञानदादा आईसारखे रांधून-वाढून प्रेमाने खाऊ घालतोय सगळ्यांना. माउलीच झालाय तो सर्वांची. आता मलादेखील मोठे व्हायला हवे, असा विचार मनात येण्याआधीच मोठी झाली मुक्ता.

खरे तर विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी अन विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी ! पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून या माता-पित्यांस निरोप घ्यावा लागला विश्वाचा ! अन्‌ लहान वयात प्रौढत्व, समंजसता आली चार लेकरांना. चौघांमध्ये सर्वांत लहान मुक्ता. निवृत्तीची घनदाट ममता अन् डोक्यावर मऊपणे थोपटणारा ज्ञानदेवांचा हात मुक्ताला मोठेपणा देऊन गेला. कशी मोठी झाली मुक्ता? तिचेच शब्द-

तात आणि माता गेलीसे येथून । तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा
निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्‍नाचे अन्‍न । सांभाळी सोपान मजलागी
तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ…

कालक्रमण केले ते हरीच्या, परमेश्वराच्या योगाने ! तक्रार नाही केली कशाचीच. कोरान्‍नाचे अन्‍न खाऊन मोठे होणे सोपे नव्हते. आळंदीमध्ये माधुकरीच्या भिक्षेसाठी जात निवृत्ती-ज्ञानदेव. आईबापाविना राहणारी इवलीशी मुले; पण समाजाला काय त्याचे? ना प्रेम, ना दया ! भिक्षा मागून परतले की झोळीतून काय काय बाहेर पडायचे. कोण्या कनवाळू मातेच्या हातातून ओसंडणारे ममत्व कोरान्‍नाच्या रूपाने येतही असे. पण कुटिलांच्या दुष्टबुद्धीचे दानही त्यासोबत पडायचे. चिंध्या काय नि शेणकुटे काय, खलप्रवृत्तीची प्रतीकेच झोळीत पडायची. हे सारे देताना अपशब्दांची जोड असायची ती वेगळीच.

एकदा असेच घडले. ज्ञानदेव गेले होते भिक्षेला. त्यांना सवय झाली होती अपशब्द ऐकून घेण्याची. सहन करणे अन् क्षमा करणे मनाचा स्थायीभाव झाला होता. कधीही कुणाला उलट उत्तर देत नसत; पण एकदा कोणी तरी आईबद्दल वाईटसाईट बोलले अन् ज्ञानोबांच्या जिव्हारी लागले. सहन होईनासे झाले त्यांना. तडक आपल्या ताटीत परतले अन् 'आता मी प्राणत्याग करतो' अशा टोकाच्या भूमिकेला जाऊन पोहोचले. ताटीचे दार घट्ट लावून घेतले. कुणाचेही काही ऐकेनात. अशा वेळी समजूत घालायला धजावली ती मुक्ता. मोठी झाली जणू ज्ञानदादापेक्षा अन् कळवळ्याच्या स्वरांनी विनवू लागली. काय काय आठवण दिली तिने ज्ञानेशाला. आदिनाथांपासून गहिनीनाथांकडे अन् त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवांकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, 'योगी'पणाचे स्मरण दिले. योगी कोणाला म्हणायचे? तर जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले, अगदी रागाने अग्‍निरूप झाले तरी आपण नाही रागवायचे. आपण जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्‍नीला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दांत समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग.

योगी पावन मनाचा । साहे अपराध जनांचा
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश
विश्वपट ब्रह्मदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा

एवढीशी मुक्ता सांगतेय ! खरेतर आदिमाताच ती. मुक्तपणे या अवनीवर अवतरली. म्हणून सांगू शकत होती साक्षात ज्ञानदेवांना. ज्याच्या अंगी दया-क्षमा असते तो संत. संतांच्या चित्ताला लोभ अन् ममता यांचा स्पर्श होत नाही. ज्याच्या मुखातून शुद्ध ज्ञानाचा प्रवाह वाहतो तो संत. एवढे अगाध ज्ञान सांगतानाही मुक्ताच्या शब्दातून लडिवाळपण ओसंडते. समजावताना म्हणते, अरे ज्ञानदादा आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दु:ख करू नये. आपलीच जीभ आपल्या दाताखाली सापडली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात. असे दटावणारे शब्दही मुक्ताचे.

हात आपुला आपणा लागे । त्याचा करू नये खेद
जीभ दातांनी चाविली । कोणे बत्तीशी पाडिली
चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदी नाचे

मुक्ता तिच्या गोड आवाजात अनेक परींनी समजावत होती ज्ञानदादाला. मन शुद्ध झालं, की देव भेटतो हे तूच शिकवलेस ना आम्हाला? मग आम्ही तुला काय सांगावे नि शिकवावे? निवृत्तीदादा अन सोपानदादादेखील एकदा मुक्ताकडे अन् एकदा कुटीकडे पाहत होते. ज्ञानदेवांची अपेक्षित प्रतिक्रिया येत नव्हती. ताटीचे दार उघडत नव्हते. मुक्ताईचा स्वर आर्त झाला होता. त्या आवाजात आता कंपने भरली होती. खरे तर रडवेली झाली होती ती; पण डोळ्यांत पाणी आणायचे नव्हते. ज्ञानदादाने सांगितलेला आईचा निरोप तिच्या मनाला व्यापून होता. काहीतरी करून ज्ञानदादाचा राग शांत करायला हवा. त्यांच्या हातून रागाच्या भरात कोणतीही आगळीक होऊ नये म्हणून परोपरीने विनवतेय मुक्ता. ज्ञानदेवांच्या उपदेशाने जगाचा उद्धार व्हावा अन् ते स्वत: सुखाचे सागर व्हावे, या उत्कट इच्छेने विनवीत आहे. जे घडते ते परमेश्वरी इच्छेने घडते, याची जाणीव ज्ञानदेवांना देऊन "पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा" असे सांगतेय. मोठ्या भावाचा राग शांत करण्यासाठी कधी जणू त्याच्यापेक्षा मोठी होऊन मुक्ता उपदेश करतेय, असेही वाटते ताटीच्या अभंगात. समजावण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते,

लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्दल ठायीचे ठायी
तुम्ही तरुन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा

बोलणे लडिवाळ, पण ध्येयाची जाणीव देणारे. ज्ञानदेवांचा अवतार विश्वाला तारण्यासाठी आहे, याचे भान डोकावले शब्दांतून अन् जे हवे होते ते घडले. ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले शांतपणे ! त्यानंतर आयुष्यात अलौकिक कार्य घडले त्यांच्या हातून. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला कृपा श्री निवृत्तिनाथांची अन् ध्येयस्वप्नांची जाणीव मुक्ताची होती.

मुक्ताईच्या हातूनही विश्व उद्धाराचे कार्य घडले. जपतपाच्या सामर्थ्याने चौदाशे वर्षे आयुष्य लाभलेल्या चांगदेवांची गुरुमाउली झाली मुक्ताई. तिचे वय १०/१२ वर्षांचे असले तरी अलौकिक संतत्व होते तिच्यात. मुक्ताईच्या अनुग्रहाने चांगदेवाना आत्मरूपाची प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षांचे आयुष्य धन्य झाले. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, "मुक्ताई करे लेइले अंजन"

अशीही मुक्ताई मोठी धीराची. ज्ञानदादाच्या समाधीनंतर सोपानदादा अन् निवृत्तीदादाला सावरणारी, आधार देणारी. सोपानदादाच्या समाधीनंतर मात्र आपलेही जीवित कार्य संपल्याची प्रगल्भ जाणीव झाली तिला. आकाशातून कोसळणार्‍या विजेसह क्षणार्धात लुप्त झाली मुक्ता; पण मागे ठेवून गेली घनघोर पाऊस तिच्या आठवणींचा, अभंगांचा. तिच्या मनातल्या ध्येय-स्वप्‍नांची पूर्तता झाल्याचा लख्ख उजेडही मागे उरला आहे. 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' अशी ग्वाही देत हा प्रकाश आपलीही मने तेजस्वी करो.
(संपादित)

प्रतिभा औटी-पंडित
सदर- संपादकीय
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्‍स (२१ मे २०१७)
(Referenced page was accessed on 25 April 2020)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.