A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदवनभुवनी

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी

त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडिली मोठी, आनंदवनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी

भक्तांसी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तांसी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी

येथूनी वाचती सर्वे
ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी

उदंड जाहले पाणी
स्‍नानसंध्या करावया
जप-तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी
गीत - समर्थ रामदास
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
गीत प्रकार - स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा
  
टीप -
• प्रतिध्वनी- उषा मंगेशकर, सोनाली राठोड.
उदंड - पुष्कळ.
संध्या - दिवसातून तीन वेळा करण्याची (देवांची) उपासना.
नोंद
छत्रपती शिवाजी महाराजांना ६ जून १६७४ या दिवशी राज्याभिषेक झाला. समर्थांना या घटनेमुळे अतिशय आनंद झाला. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी समर्थांनी ५९ कडयांचे अत्यंत भावपूर्ण प्रकरण लिहिले, ते 'आनंदवनभुवन' होय.

'वनभुवन' हे काशीचे पौराणिक नाव आहे. १६३४ साली समर्थ काशीला होते. तिथे त्यांना स्वप्‍न पडले की, महाराष्ट्रात हिंदूंचा राजा सिंहासनावर बसला आहे. १६३४ साली पडलेले स्वप्‍न १६७४ साली खरे झाले. म्हणून ते लिहितात-
स्वप्‍नी जें देखिलें रात्रीं । तें तें तैंसेंची होतसे ।
हिंडता फिरतां गेलों । आनंदवनभुवना ॥
समर्थांची अशी धारणा होती की औरंगजेबाचे राज्य म्हणजे जणू रावणाचे राज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे रामचंद्रांसारखे तप:पूत जीवन. शिवछत्रपतींच्या प्रयत्‍नांना यश यावे आणि आपल्याला ते प्रत्यक्ष बघायला मिळावे म्हणून समर्थांनी तुळजाभवानीला 'तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हांची देखता ॥' असे साकडे घातले होते.

- सुनील चिंचोलकर (dasbodh.com)

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.