A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मालवून टाक दीप

मालवून टाक दीप चेतवून अंग अंग !
राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलात
पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्‍नभंग !

गार गार या हवेत
घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूर दूर तारकांत
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल?
कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?

काय हा तुझाच श्वास?
दर्वळे इथे सुवास !
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग !
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
सुगम संगीताचा गाभा म्हणजे शब्द. जवळपास शंभर वर्षांच्या सुगम संगीताच्या इतिहासात अनेक मोठ्या कवींचे शब्द घेऊन नामवंत संगीतकारांनी त्यांना स्वरबद्ध केलं आणि महान गायक - गायिकांनी त्यांना आपले आवाज दिले. ती गाणी आजरामर आहेत. संत साहित्यातही संतांच्या शब्दांना चाली लावायचा मोह संगीतकारांना झाला. लोकसंगीत घराघरात पोहोचलं, लोकप्रिय झालं. ते त्यातल्या सहजसोप्या शब्दांमुळेच. अगदी रोजच्या बोली भाषेतलं 'खोप्यामध्ये खोपा.. तिनं झोका झाडाला टांगला'सारखे शब्दच अशी गाणी लोकप्रिय करायला कारणीभूत ठरले. साहित्यिक, सांगीतिक गायकी मूल्यांचा आणि त्यांच्या श्रेयाचा जेव्हा विचार होतो तेव्हा श्रेयावलीत आधी शब्द, मग संगीत आणि त्यानंतर गायन असा क्रम लागतो, लागायला हवा. तेव्हा ह्या शब्दांच्या जादुगारांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, की ज्यांच्या शब्दांमुळे आपल्याला हजारो सुंदर गीतांचा मनमुराद आनंद घेता आला.

असेच एक शब्दांचे जादुगार होऊन गेले, विदर्भाचे कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या एका सुंदर गीताचा हा किस्सा. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं आणि लता मंगेशकरांनी गायलेलं ते गीत म्हणजे 'मालवून टाक दीप चेतवून अंगअंग..'

काही कवी असे आहेत, ज्यांना काव्याबरोबर संगीताचीही उत्तम जाण आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले गीतकार नीरज हे त्यातलं एक नाव आहे. ज्यांनी 'प्रेमपुजारी' चिपटातलं 'शोखियोंमें घोला जाये..' सारखी अप्रतिम गीतं लिहिली. कवी प्रदीप जे उत्तम गायकही होते, 'देख तेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान' हे त्यांच्याच आवाजातलं गीत आहे. मराठीतले प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर, जे त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचे आणि त्यात गायचेही.

सुरेश भट हे त्यातलेच अजून एक नाव. एकदा संध्याकाळी ते फिरायला गेले असता एक तरुण बासरीवादक एका कट्ट्यावर बसून बासरी वाजवत होता. सूर भटियार रागातले होते. भटसाहेबांनी स्वत:च सांगितलं आहे, की ते सूर ऐकून मला ओळी सुचायला लागल्या- 'मालवून टाक दीप चेतवून अंगअंग.. राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग..' नुसत्या ओळी सुचल्या नाहीत तर त्याची चालही त्यांना सुचली आणि ती बासरीचे सूर वाजत असलेल्या भटियार रागातली होती. गंमत अशी की ते गीत तिथेच थांबलं. गाण्याचे पाच अंतरे सुचून ते पूर्ण व्हायला भटसाहेबांना पुढचे सहा महिने लागले. कवीला कसली आली आहेत वेळेची बंधनं?

इतरही नामवंत कवींच्य बाबतीतही असं घडलेलं बहुश्रुत आहे. उशिरा पूर्ण झालेल्या ह्या गीताचं भाग्य असं थोर, की त्याला हृदयनाथ मंगेशकरांनी चाल लावली आनि एवढंच नाही, तर लता मंगेशकरांच्या आवाजात ते ध्वनिमुद्रित झालं. गीताचा आशय लक्षात घेऊन हृदयनाथांनी गीताच्या वाद्यवृंदात रुद्र वीणा एवढं एकच सूरवाद्य आणि कमीत कमी तालवाद्यं वापरली. आहेत. चाल मात्र भटसाहेबांच्या भटियार मधली नव्हती.. भटियार हा प्रभातकालीन राग आहे. लता मंगेशकर ते असं गायल्यात , की केवळ त्याच ते गाऊ शकतात. त्यांची गायकी, लयकारी, अभिव्यक्ती सगळंच अद्वितीय. भटसाहेबांच्या शब्दांना पूर्ण न्याय मिळाला आहे.

गीत अफाट लोकप्रिय ठरलं. सुरेश भटांचं आणि मंगेशकर कुटुंबाचं विशेष सायुज्य जुळून आलं आहे. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे दोन्हीही प्रखर प्रतिभावान. 'मेंदीच्या पानांवर..', 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..', 'उष:काल होता होता..', 'चांदण्यात फिरताना..', ही हृदयनाथांनी स्वरबद्ध केलेली गाणी भटसाहेबांचीच. आशा भोसलेंनी जाहीरपणे म्हंटलं आहे की, "भटसाहेबांनी लिहिलेल्या गाण्यांबद्द्ल मी पझेसिव्ह आहे. ती माझ्याशिवाय कोणीच म्हणू नये असं मला वाटतं.".. इतकी ती गाणी त्यांना प्रिय आहेत.

'मालवून टाक दीप..' सारख्या उत्कट, उन्मादक गीताचे शब्द उन्मुक्त आणि फटकळ स्वभावाच्या भटसाहेबांनी इतके तरल आणि संयत लिहिलेत, की अशा पद्धतीचं काव्य मराठी सुगम संगीतात एकमेवच असावं. गाण्याची शेवटची ओळ 'बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग..' म्हणजे तर मास्टर स्ट्रोक आहे.. आणि म्हणूनच भटसाहेब स्वत:बद्दलच म्हणताहेत, 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा.. गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा..'

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.