भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते ! जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
गीत | - | स्वातंत्र्यवीर सावरकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर ∙ सुधीर फडके ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- ब्रायटन, १९०९ साल. • 'अभिनव भारत' या संस्थेवर वक्रदृष्टी झाल्यामुळे अत:पार आपाल्याला हिंदुस्थानला परतता येणार नाही नि आपण लवकरच धरले जाऊ असें स्वातंत्र्यवीर सावरकरांना निश्चितपणे वाटले. त्यावेळी लंडनपासून साधारणपणे ८० कि.मि. दूर असलेल्या ब्रायटनच्या समुद्रकाठी ते गेले असता स्वजनांची आठवण होऊन त्यांनी ही कविता लिहिली. • आम्रवृक्षवत्सलता - बाबाराव सावरकर • नवकुसुमयुता - पत्नी, वहिनी, भगिनी या घरातील स्त्रिया • बाल गुलाब - लहान भाऊ बाळ • फुलबाग - भगूरचे घर, संपूर्ण कुटुंब • मूळ कवितेत - 'जो आचमनी एक पळीं तुज प्याला' असे आहे. • स्वर - मंगेशकर कुटुंबीय, संगीत- पं. हृदयनाथ मंगेशकर |
अगस्ती | - | महाभारतात अगस्ती ऋषींनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देव-दानव युद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेला कालकेय हा दानव समुद्राच्या तळाशी जावून लपला. तेव्हा अगस्तींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयाला ठार मारले आणि देवांवरील संकट दूर केले. |
उद्धरणं | - | उचलणे. |
तइं | - | तेव्हा. |
तम | - | अंधकार. |
ती आम्रवृक्षवत्सलता | - | बाबाराव सावरकर. |
तो बाल गुलाबहि | - | लहान भाऊ बाळ. |
नवकुसुमयुता त्या सुलता | - | पत्नी, वहिनी, भगिनी या घरातील स्त्रिया. |
पंजर | - | पिंजरा. |
पृष्ट(ष्ठ) | - | पाठ. |
पाश | - | जाळे. |
फेन | - | फेस. |
फुलबाग मला | - | भगूरचे घर, संपूर्ण कुटुंब. |
मार्गज्ञ | - | मार्ग दाखवणारा. |
मिष | - | निमित्त. |
युत | - | युक्त, जोडलेले. |
योगे | - | कारण. |
लता (लतिका) | - | वेली. |
वत्सल | - | प्रेमळ. |
व्यय | - | खर्च. |
विवासनं | - | हद्दपारी. |
शुक | - | पोपट. |
शक्त | - | समर्थ, शक्तियुक्त. |
सुमन | - | फूल. |
सरित्पति | - | समुद्र. |
सरिता | - | नदी. |
स्वये | - | स्वत: |
साच | - | खरे, सत्य. |
सांप्रत | - | हल्ली, सध्याच्या काळी. |
ने मजसी ने परत मातृभूमीलाजणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत.. ते सागरावर रागावलेले आहेत.. 'सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस..
भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होतामी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास.. मित्र, मित्राला म्हणतो तसा.. की चल जरा फिरायला जाऊ.. दुसर्या देशात..
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहूत्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात.. माझा विरह तिला होईल की काय? अशी शंका आली.. पण तू तिला वचन दिलंस..
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें ।
परि तुवां वचन तिज दिधलें
.. की मी मार्गज्ञ, म्हणजे वाट माहित असणारा आहे आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन.. (जहाज सागराच्या पृष्टावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार)..
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन ।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
पाण्याची उद्धरण शक्ती (buoyancy) आणि 'उद्धार करणे' याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी.. तुझ्या उद्धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद्धार केलास बरं !
तव अधिक शक्त उदधरणी । मी
लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
'येईन त्वरे' कथुन सोडिलें तिजला ।
सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
तमोमय म्हणजे अंधःकारमय.. मार्ग दिसत नाही असं झालंय.
भूविरह कसा सतत साहू यापुढती ।
दशदिशा तमोमय होती
मी जे शिक्षण घेतले आहे, उदात्त आणि उन्नत अंगिकारण्याचा जो प्रयत्न केला आहे.. त्याचा जर मातृभूमीसाठी, तेथील सर्वसामान्य आणि पीडित जनतेसाठी जर उपयोग करता आला नाही तर ते सर्व व्यर्थच नाही का?
गुण-सुमनें मी वेचियली या भावें ।
की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा
मला काय आठवतं? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही.)
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला
राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा मातृभूमीच्याच वनातला हवा आहे. तुरुंगात घातलं तरी भारतातल्या तुरुंगात यांनी घालावं.. पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा
हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती.. इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सावरकर सागराला म्हणत आहेत.. माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतमातेचा मला विरह घडवशील तर.. हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल, अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर.. मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
भुलविणें व्यर्थ हें आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे
त्वद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला
यानंतर आता शेवटचं कडवं आहे. त्यात सावरकरांची आर्त आहे; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला.. गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत.. तर त्याच्या लाटा तशाच उसळून, फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्याप्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरुषाने आव्हान दिल्यावर खलपुरुष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात..
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा
माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणार्या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणार्या सागरा..
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ।
मज विवासनातें देशी
विजनवास विदेशवास किंवा विवास.. तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणार्या भित्र्या खलपुरुषा, ऐक..
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबल न माझिही माता । रे
माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस..
कथिल हे अगस्तिस आता । रे
आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.
मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरुष सागरावर रूसलेला आहे. या वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरुषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणार्या सागरावरचा रोष या रचनेत प्रकट झालाय.
(संपादित)
सौजन्य- www.savarkar.org
(Referenced page was accessed on 20 Feb 2015)